नदीतील अतिक्रमणे पुराला कारणीभूत

Flood
Flood

खडकवासला - धरणातून मुठा नदीत यंदा पूरपातळीपेक्षाही कमी पाणी सोडले असताना शहर आणि ग्रामीण भागात पूर आला. नदीपात्रातील अतिक्रमणे याला कारणीभूत ठरली आणि अनेक संसार वाहून गेले. खडकवासला, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवणे, नांदेड, वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक, वारजे माळवाडी, विठ्ठलवाडी (हिंगणे खुर्द), कर्वेनगर (हिंगणे बुद्रुक) एरंडवणा, पर्वती अशा गावांचा या अतिक्रमणांत समावेश आहे.

खडकवासला धरणातून सुमारे ४६ हजार क्‍युसेकचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता. मुठा नदीची पूररेषा ही साठ हजार क्‍युसेकची आहे. महापूर रेषा एक लाख क्‍युसेकपर्यंत आहे. मात्र ४६ हजार क्‍युसेक पाणी सोडले असतानाही महापूर आला. शहरातील झोपडपट्ट्यांमधील घरे तसेच इमारतींमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार घडले. नदीपात्रात अनेक ठिकाणी राडारोडा, दगड-माती मुरूम टाकून भराव तयार करण्यात आला. कच्चे रस्ते केले आहेत. स्मशानभूमी, दशक्रिया विधीचे घाट, त्याचे निवारा शेड, रस्ते, पूल, ही सर्व अतिक्रमणे या पाण्याबरोबर वाहून गेली.

धरणातून पाणी सोडल्यानंतर कोंढवे-धावडे, उत्तमनगर हे पहिले गाव लागते. तेथे भीमनगरमधील काही झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे नऊ कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले होते. येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी गेले होते. उत्तमनगर येथील तीन कुटुंबांना स्थलांतर करावे लागले होते. नांदेड, शिवणे या ठिकाणी स्मशानभूमीलगत असलेले मातीचे भराव व रस्ते वाहून गेले आहेत. वारजे माळवाडी परिसरातील तपोधाम परिसरातील बैठी घरे, इमारती झोपड्यांमध्ये पाणी शिरले होते. वारजे माळवाडी परिसरातून सुमारे ५५-६० लोकांचे तात्पुरते स्थलांतर करावे लागले होते.

हिंगणे खुर्द, वडगाव बुद्रुक यादरम्यान नदीकाठी असलेल्या एकतानगरी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी आल्यामुळे स्थलांतर करावे लागले. शहरातदेखील आणि ठिकाणी नागरिकांचे पुनर्वसन करावे लागले. नदीपात्रात राडारोडा टाकून भराव तयार केले होते. अनेक ठिकाणी नदीपात्रात झोपडपट्ट्यादेखील उभारण्यात आल्या आहेत. नदी पात्रातील अतिक्रमणांबाबत ग्रामीण भागात जिल्हाधिकारी आणि शहरी भागात महापालिका आयुक्तांचे अधिकार आहेत. हे दोघे नदीचे मालक आहेत.

नदीतील अतिक्रमणे काढण्यासाठी आमच्याकडे तशी आर्थिक तरतूददेखील नाही; परंतु कालव्यातील अतिक्रमणांची आमची जबाबदारी आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले.

आमची मालकी ही सरकारी जागेबाबत असते. नदीची जबाबदारी प्राधिकरण, पाटबंधारे विभागाची आहे. त्यामुळे नदीतील अतिक्रमणांबाबत त्यांनीच कारवाई करावी. नदीपात्रालगतच्या जमिनीवर एनएची परवानगी द्यायची असल्यास आम्हाला पाटबंधारे विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. जागा जर पूररेषेच्या बाहेर असल्यास त्याची परवानगी देतो. 
- सचिन बारवकर, प्रांताधिकारी, हवेली

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांची जबाबदारी पाटबंधारे विभागाकडे असते. त्यामुळे आम्ही खडकवासला, पानशेत व वरसगाव या तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्राचा ड्रोनद्वारे सर्व्हे केला. अनेक ठिकाणी फार्महाउस मालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यांना नोटिसा दिल्या आहेत. धरणाच्या महत्त्वपूर्ण पातळीच्या अनेक ठिकाणी आम्ही खुणा केल्या आहेत. त्याच्या आतमध्ये जागा आहेत, त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. पूररेषा आम्ही जरी ठरवत असलो, तरी नदीपात्रातील वाळूचे लिलाव हे महसूल विभागामार्फत केले जातात.
- राजकुमार क्षीरसागर, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, खडकवासला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com