अनलॉक'ला आता डेडलॉक नको; अनलॉककडून लॉकडाऊन हा उलटा प्रवास न परवडणारा

Sambhaji Patil writes about unlock to lockdown is reverse journey unaffordable
Sambhaji Patil writes about unlock to lockdown is reverse journey unaffordable

पुणे : कोरोना झालेल्या रुग्णांपैकी पुण्यात तब्बल 65 टक्के रुग्ण बरे झाले, ही निश्‍चितच समाधानाची बाब आहे. पण गेल्या तीन महिन्यात आपल्याला कोरोना रूग्णवाढीची साखळी मात्र तोडता आली नाही, हे तेवढीच चिंतेची बाब आहे. रूग्णांना औषधोपचार देणं, हे तर करावेच लागणार आहे. पण रूग्णवाढीचे गणित कुठे फसते आहे, हे शोधून त्यावर उपाय करावा लागेल. अन्यथा "अनलॉक' कडून "लॉकडाऊन' हा उलटा प्रवास कोणालाच परवडणारा नसेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यात मुंबई खालोखाल पुण्यात कोरोनाची रूग्ण संख्या आहे. रूग्णसंख्या आटोक्‍यात यावी यासाठी येथे "लॉकडाऊन'चे सर्व प्रयोग करून झाले आहे. कंटेन्मेंट भागात आजही पत्रे ठोकून रस्ते बंद करण्यापासून फक्त जीवनावश्‍यक वस्तूंचीच दुकाने उघडण्यापर्यंत उपाययोजनाही करण्यात आली आहे.

शहरातील 66 भागात कंटेन्मेंट झोनसाठी केलेल्या नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. एवढे करूनही गेल्या तीन महिन्यांपासून रूग्णसंख्या वाढीचा वेग मात्र आपल्याला कमी करता आलेला नाही, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही टीका करण्याची वेळ निश्‍चितच नाही, पण एकूण यंत्रणांमध्ये काहीशी शिथिलता आली आहे, हेही नाकारता येणार नाही.

एका बाजूला नागरिकांचा संयम संपल्याने लोक बिनधास्त घराबाहेर पडले आहेत. त्यांना रोखणे आता कठीण आहे. पण ज्या भागात रुग्णांची संख्या आहे, तेथे तत्काळ उपाययोजना करण्यास आपण कमी पडत आहोत. पुण्यात आतापर्यंत 66 हजाराच्यावर चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 8 हजार 777 जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यातील तब्बल 5 हजार 782 जण कोरोनामुक्ती झाले. ही उपलब्धी मोठी आहे. पण 19 दिवसांमध्ये आपल्याकडे रूग्णसंख्या दुप्पट होत आहे. नेमके रूग्ण कोण आहेत, याचा आपल्याला अंदाज आला आहे, मात्र, त्यांच्यापासून होणाऱ्या संसर्गाला आपण आजही अटकाव घालू शकलो नाही. एका बाजूला वाढलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने उभारली आहे. ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर असणारे आयसीयू बेड आपण पुरेसे उपलब्ध केले आहेत. आता गरज आहे, ती मुळात घाव घालण्याची, रूग्णवाढीची साखळी तोडण्याची.

कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे प्रभावी सर्वेक्षण व नियोजनावर आता भर द्यायला हवा. या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडणार नाहीत, याची प्रभावी यंत्रणा उभी करावी लागेल. हे करण्याची हीच खरी वेळ आहे. कारण, नागरिक आता मोठ्यासंख्येने बाहेर पडले आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना शोधून त्यांच्यापासून आणखी लोक बाधित होऊ न देण्यासाठी अधिक यंत्रणा उभी करावी लागेल. यात नागरिकांचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. कोरोना संपला या भ्रमात वावरत राहिलो तर आपल्याला कोणीच वाचवणार नाही, हे नक्की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com