ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे यांचे निधन

 mohan-ranade.jpg
mohan-ranade.jpg

पुणे : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व गोवा मुक्ती मोर्चा सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचे आज सकाळी 6 वाजता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. ते 90 वर्षाचे होते. गोवा मुक्ती लढ्यातील आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी मोहन रानडे हे कर्करोगाने गंभीर आजारी होते.  

वडगाव बुद्रूक येथे ते राहत होते. तिसऱ्या मजल्यावर त्यांचे घर होते मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना चढउतार करणे शक्‍य नव्हते. हे लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबियांनी इस्पितळाच्या परिसरातच भाड्याने खोली घेऊन त्यांची व्यवस्था केली आहे. शुश्रुषेसाठी दोन व्यक्तीही नेमल्या होत्या. राज्य सरकारने त्यांना यासाठी दीड लाख रुपयांचे सहाय्य केले आहे.

रानडे यांचे यांचे पार्थिव कर्वेनगर ताथवडे उद्यान समोर स्वरगंगा बंगला येथील सध्याच्या घरी दुपारी 12:30 पर्यंत ठेवणार आहेत. त्यानंतर मंगेशकर रुग्णालयातील शवागृहात ठेवणार आहेत. गोव्याचे समाजकल्याण मंत्री मिलिंद नाईक, आणि अन्य दोन मंत्री त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार असून 3:30 वाजेपर्यंत ते  पुण्यात पोचतील. त्यानंतर 4 :30 ते 5 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अशी माहिती स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेतील पदाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.

मोहन रानडे यांचा अल्प परिचय :
रानडे यांचा जन्म 25 डिसेंबर 1930 साली सांगलीत झाला. त्यांचे खरे नांव मनोहर आपटे. गोवा मुक्तीलढ्यात काम करताना एखाद्याने वेष पालटावा, तितक्‍या सहजपणे रानडेंनी आपले नाव बदलले. त्यानंतर मनोहर आपटे हे आपले खरे नाव आहे, हे ते विसरून गेले. गोवा मुक्तीनंतर ते भारतीयांसमोर प्रकटले ते मोहन रानडे म्हणूनच. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्त झाला. त्यावेळी रानडे पोर्तुगीज तुरूंगात शिक्षा भोगत होते. तब्बल साडेतेरा वर्षांचा तुरूंगवास त्यांनी भोगला आणि विमोचन समितीचे सुधीर फडके, अॅड. शंकर तथा प्रीती कामत इत्यादींच्या अथक परिश्रमामुळे त्यांची अखेर 1969 च्या जानेवारीमध्ये सुटका झाली.  

गोव्यात त्यांनी "गोमंतक मराठी शिक्षण परिषद' स्थापन केली. या संस्थेचे ते कार्यवाह होते. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी यथाशक्ती गोव्यात शिक्षण प्रसाराचे काम केले. नंतर 1986 साली त्यांनी महिला व बालककल्याण गृह या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे चिंबल येथील झोपडपट्टी व गलिच्छवस्तीत राहणाऱ्या गरीब, उपेक्षित अशा गरजू महिला व बालकांसाठी त्यांनी कार्य केले. या कार्यात पत्नी विमल रानडे यांचा सक्रिय सहभाग लाभला.

 "इंडियन रेडक्रॉस' या नावाजलेल्या संस्थेच्या गोवा शाखेचे ते 1988 ते 1992 पर्यंत अध्यक्ष होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर दै. "गोमन्तक'मधून दीर्घ मालिकाही त्यांनी लिहिली होती. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com