

ARM26B03470
शेवगाव : प्रशासनाच्या वतीने जगदीश पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
आंदोलन मागे नव्हे केवळ स्थगित
आंदोलकांचा प्रशासनास इशारा ः अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन
शेवगाव, ता. २६ : ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासून वंचित असलेल्या माळेगाव-ने (ता. शेवगाव) परिसरातील सात बंधारे, तलाव व नालाबंडिंग वर्षातून किमान सहा वेळा पाण्याने भरावीत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी, महिला व युवकांनी सुरू केलेले घेराव आंदोलन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले. मागण्यांची प्रत्यक्ष पूर्तता होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
ताजनापूर उपसा सिंचन योजना पाठपुरावा चळवळीचे नेते ॲड. शिवाजीराव काकडे व माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. २४) सकाळपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. मागण्यांबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय व्हावा, यासाठी आंदोलकांनी संपूर्ण रात्र उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरातच मुक्काम केला. दरम्यान, आंदोलनाची दखल घेत अहिल्यानगर येथील मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील आंदोलनस्थळी दाखल झाले. अखेर प्रशासनाने मागण्यांबाबत निश्चित कालमर्यादा देत लेखी आश्वासन दिले.
त्यानुसार, यांत्रिकी विभागाचे अपूर्ण काम पूर्ण करून येत्या शुक्रवारी (ता. २८) ताजनापूर योजनेतून पूर्वीच्या मंजुरीतील दोन बंधाऱ्यांना पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच उर्वरित पाच पाणलोट क्षेत्रांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी ताजनापूर उपसा सिंचन योजनेतील फेरनियोजनातून उपलब्ध होणाऱ्या शिल्लक पाण्याचा वापर करण्यासाठी आवश्यक अंदाजपत्रक मंजुरीचा प्रस्ताव १० सप्टेंबर २०२६ पर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. प्रशासनाने लेखी दिल्यानंतर ॲड. शिवाजीराव काकडे यांनी आंदोलकांच्या वतीने आंदोलन पूर्णपणे मागे न घेता ‘स्थगित’ करण्याची घोषणा केली.
यावेळी ताजनापूरचे उपविभागीय अधिकारी श्रीहरी कुलकर्णी, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी विभाग) दत्तात्रय गुळमकर, उपअभियंता अविनाश आव्हाड यांच्यासह ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावडे, लक्ष्मण गवळी तसेच माळेगाव-ने व तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया :
प्रशासनाकडून निश्चित मुदतीचे लेखी आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे आंदोलन पूर्णपणे मागे घेतलेले नाही, तर केवळ स्थगित केले आहे. माळेगाव-नेच्या शेवटच्या पाणलोट क्षेत्रात ताजनापूरचे पाणी पोहोचेपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल.
- अॅड. शिवाजीराव काकडे
प्रतिक्रिया : यांत्रिकी विभागाची जोडणी पूर्ण करून ताजनापूर योजनेतून शुक्रवारी (ता. २८) पाणी सोडण्यात येईल. पूर्वीच्या मंजुरीनुसार त्यातून दोन बंधारे भरतील. ग्रामस्थांच्या मागणीनुसार उर्वरित पाच पाणलोट क्षेत्रांना पाणी देण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठीच्या अंदाजपत्रक मंजुरीचा प्रस्ताव १० सप्टेंबर २०२६ पर्यंत वरिष्ठांकडे सादर केला जाईल.
- जगदीश पाटील, कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग, अहिल्यानगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.