Ajit Pawar : महाराष्ट्रात कधीही एका पक्षाचे सरकार येत नाही

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

राजगुरुनगर - शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

महाराष्ट्रात कधीही एका पक्षाचे सरकार येत नाही. त्यामुळे विचारधारा न सोडता भविष्यातही आम्ही मित्र पक्षांबरोबर सरकार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. योग जुळून आले म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तसे दिलीप मोहिते मंत्री झाले तर मीही मुख्यमंत्री होईल, असे ते मिश्कीलपणे म्हणाले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व प्रचाराची दिशा ठरविण्यासाठी खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, आमदार दिलीप मोहिते यांच्या घरासमोर बुधवारी आयोजित केला होता, तेव्हा ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, सुरेश घुले, प्रदीप गारटकर, मोनिका हरगुडे आदी नेते उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'केंद्रात मजबूत नेता आणि पूर्ण बहुमताच्या सरकारची गरज आहे. पूर्वीच्या काळात जनता पक्षाप्रमाणे खिचडी सरकार आले की काय होते ते आपण पाहिले आहे. विरोधकांना अजून त्यांचा नेता कोण हे सांगता येत नाही. जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. ती तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे. पंतप्रधान मोदींनी जगात भारताची प्रतिमा सुधारण्याचे काम केले आहे. तसेच भारतातही आमूलाग्र बदल घडवून आणला. भारताच्या विकासाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे. म्हणून मोदींना पर्याय नाही."

सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याच्या कारभारात ढवळाढवळ होत होती. म्हणून ते अस्वस्थ होते. त्यांना आदर दिला जात नव्हता. ते नाराज असल्याचे आणि काही तरी गडबड चालू असल्याचे आम्ही उद्धव ठाकरे व पवारसाहेबांना सांगत होतो. पण आमच्या म्हणण्याला महत्त्व दिले नाही. शिंदे साहेब सुरतला गेल्यानंतर अन्य काही जण जाण्याच्या तयारीत होते, तेव्हाही उद्धव ठाकरेंनी जातायत तर जाऊ दे, अशी भूमिका घेतली, असे पवार म्हणाले.

आता पर्यंत पवार साहेब सांगतील तसे वागत आलो. पण दरवेळी मला तोंडघशी पाडण्यात आले. कोणाला न विचारता साहेबांनी २०१४ साली भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. काही दिवसांनी सरकारमध्ये जाऊ असे सांगण्यात आले. त्यानंतर २०१७ साली सरकारमध्ये सामील होण्याची चर्चा झाली. तेव्हा शिवसेना सरकारमध्ये चालणार नाही, अशी भूमिका घेतली.

पुढे २०१९ साली भाजपबरोबर जाण्याची चर्चा झाली, ऐनवेळी शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केले. आमचा पहाटेची शपथविधी वाया गेला. सतत मला एकट्याला बदनाम करण्यात आले. पुढे त्यांनी राजीनामा दिला. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करायचे ठरवले. परत राजीनामा मागे घेण्यात आला. ते सतत दोलायमान स्थितीत असतात, असा घटनाक्रम सांगत त्यांनी शरद पवारांवर टीका केली.

अमोल कोल्हे शूटिंगमध्ये व्यस्त असतात. ते अडीच वर्षांत राजीनामा द्यायला निघाले होते. राजकारण त्यांचा पिंड नाही. येथे सतत लोकांबरोबर राहून त्यांची कामे करावी लागतात. त्यांचे ते काम नाही. शिरूर लोकसभेसाठी वळसे पाटील, नाना पाटेकर, प्रदीप कंद, विलास लांडे या सगळ्यांच्या बाबतीत विचार झाला, शेवटी आढळराव पाटील यांचे ठरले आहे. ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुका अध्यक्ष होते.

तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. तेव्हा लोकसभेचे तिकीट मिळाले नाही म्हणून ते शिवसेनेत गेले. आता आढळराव पाटील यांना त्यांच्या वरिष्ठांच्या संमतीने पक्षात घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करण्यात येत आहे. ते यापुढे खेड तालुक्यात हस्तक्षेप करणार नाहीत, याची हमी मी देतो.

केंद्रात आपल्या विचारांचे सरकार आले तर विकास कामांना भरपूर निधी मिळणार आहे. तुमचे एकही काम भविष्यात बाजूला ठेवणार नाही. प्रशासकीय इमारत होईल. महानगरपालिका होईल. वाहतूक कोंडी, पाणी, वीज इत्यादी सर्व समस्या सुटतील. म्हणून बाकी सर्व बाजूला ठेवून एकजुटीने काम करा, असे आवाहन पवार यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com