Ajit Pawar
Ajit Pawaresakal

Shirur Loksabha Election : शिरुरच्या बारा गावांचा दुष्काळ संपविण्याची अजित पवारांची जाहीर ग्वाही

केंदूरच्या सभेत आढळराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन.

शिक्रापूर - शिरुरच्या बारा गावांच्या दुष्काळ हा अजित पवार संपवेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाबाबत बैठका घेवून मार्ग काढलेला आहे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव यांच्या प्रयत्नाने या प्रश्नाबाबत सर्व्हेक्षणाचेही आदेश झालेत.

त्यामुळे मला या प्रश्नी निर्णय होवून प्रस्ताव आलाच की, निधीची चिंता तुम्ही करु नका. मी आत्ताच शब्द देतो बारा गावांचा दुष्काळ मी संपविणार, मात्र मतदान हे शिवाजीराव आढळरावांनाच झाले पाहिजे याची काळजी घ्या असे म्हणत अजित पवार यांनी केंदूर (ता.शिरूर) येथील प्रचार सभा गाजविली.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केंदूर येथील श्रीराम चौकात सभा सुरू होताच अजित पवार यांनी थेट आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांना बोलायला दिले. सौ.साकोरे यांनी या भागातील दुष्काळ, येथील पाणी प्रश्न आणि त्यासाठी वळसे-आढळरावांसह देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बैठकांची माहिती दिली.

दरम्यान सौ. साकोरे यांच्यानंतर अजित पवार यांनी लगचे बोलायला उभे राहून पूर्वीचा बारामती आणि आत्ताचा शिरुर मतदार संघ असा मतदार संघ आढावा घेत आपण सन १९९२ मध्ये येथे खासदार राहिल्याने येथील सर्व प्रश्न ज्ञात असल्याचे सांगितले. मुळचे केंदूर येथील असलेले माजी दिवंगत खासदार बापूसाहेब थिटे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या खासदारकीच्या निवडणूकीची संपूर्ण जबाबदारी आपण घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल अजित पवार यांनी खुलुन बोलताना सांगितले की, सन २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी असताना ती पवार साहेबांनी नाकारली. सोनिया गांधीचा परदेशीचा मुद्दा पुढे करीत पवार साहेबांनी कॉंग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे सन २०१९ मध्ये भाजपा सोबत जायचे ठरले आणि त्यांनी माघार घेतली.

या धरसोडीमध्ये मी शेवटी भाजपासोबत जावून सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि ७२ तास उपमुख्यमंत्रीही झालो. मात्र राजकीय निर्णयांमध्ये धरसोडवृत्ती घातक असल्याचे मी त्यांना (पवार साहेबांना) सांगितले तरीही साहेबांचा हट्ट काही संपत नव्हता. एक सांगतो, मी त्यांचा मुलगा असतो तर असे निर्णय त्यांनी घेतले असते का याचे उत्तर मलाही समजत नाही.

या सर्व घडामोडींना वैतागुनच अखेर मी निर्णय घेतला व आज तुमच्यापुढे उभा आहे. वयाच्या साठीनंतर तरी आम्हाला आमचे निर्णयाचे स्वातंत्र्य यामुळे मिळाले एवढेच सांगतो. अखेर एकच सांगतो, शिरुरचे वातावरणही भावनिक करण्याचा प्रयत्न होईल. तसे काही होवू देवू नका. आम्ही बारामतीत मोठ्या फरकाने विजयी होतोय इथेही तसाच निर्णय घ्या म्हणत अजित पवारांनी मतदारांना आवाहन केले.

कार्यक्रमाला आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे, पुणे जिल्हा दुध संघाच्या माजी अध्यक्षा केशरताई पवार, जिल्हा बॅंकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, भिमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, उपसभापती सविता प-हाड, प्रमोद प-हाड, सविता बगाटे, माजी सरपंच सुवर्णा थिटे, सतीश थिटे, भगवानराव शेळके, चंदन सोंडेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राम साकोरे यांनी केले तर आभार सरपंच अमोल थिटे यांनी मानले.

मी त्यांचा मुलगा असतो तर; दादांचा भावनिक मुद्दा पण व्यवहारीकही

सन २००४ पासून ते आजपर्यंत कायमच राजकारणात धरसोडवृत्तीचा अनुभव मी घेतोय. निर्णय घ्यायचा आणि बदलायचा यामुळे आम्ही नेमकं करायचं काय काहीच करता येत नव्हते. कॉंग्रेसला सोडायचे, धरायचे, भाजपासोबत जायचे म्हणायचे आणि परत निर्णय मागे घ्यायचा.

शिवसेनेसोबत जायचे आणि पुन्हा भाजपाबरोबरच जायचे हा सगळा राजकीय खेळ मी आता वयाची साठी ओलांडली तरी पहायचा म्हणजे अवघड होतेये. अर्थात मी त्यांच्या (पवार साहेबांचा) मुलगा असतो तर अशी धरसोड झाली असती का असा प्रश्न करीत अजित पवार यांनी भावनिक मुद्दा व्यवहारी पध्दतीने मांडत उपस्थितांना चिंतनात नेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com