महापूर व दुष्काळामुळे पनीर, खव्याचा तुटवडा

महापूर व दुष्काळामुळे  पनीर, खव्याचा तुटवडा

पुणे: एकीकडे पूर परिस्थिती, तर दुसरीकडे दुष्काळ याचा सर्वाधिक फटका पनीर आणि खव्याला बसला आहे. या दोन्हींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्यांच्या भावात वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत ही परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील मिठाईवालेदेखील अडचणीत आले आहेत. 
पुणे शहरात दररोज सुमारे 25 टन पनीरचा खप आहे. हे सर्व पनीर कोल्हापूर, सांगली आणि महाराष्ट्रालगत असलेल्या कर्नाटकमधील गावांतून पुरविले जाते. परंतु, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर आणि सांगली परिसरात पूर आला. सलग आठ ते दहा दिवस या पुरामुळे सर्व पाण्याखाली गेले होते. हीच परिस्थिती कर्नाटकमध्येदेखील होती. या पुरामध्ये मोठ्या प्रमाणावर पशुधन गेले. परिणामी, दुधाचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे दुधापासून बनविण्यात येणाऱ्या उपपदार्थाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे जेथे 25 टन पनीरची गरज आहे, तेथे केवळ 15 ते 16 टनच पनीरची आवक होत आहे. त्यामुळे 200 रुपये किलोचे दर 240 रुपये किलोपर्यंत गेले आहेत, अशी माहिती पनीरचे व्यापारी आशिष आगरवाल यांनी सांगितले. 
ही परिस्थिती खव्याबाबतदेखील झाली आहे. पुणे शहरात दररोज 10 ते 12 टन खव्याचा खप आहे. तो प्रामुख्याने उस्मानाबाद, बीड, बार्शी या परिसरातून होतो. तेथे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे दुधाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे खव्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. 160 ते 180 रुपये किलो असलेल्या खव्याचे दर 220 रुपयांपर्यंत गेले आहेत, असेही आगरवाल यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com