

किल्ले सिंधुदुर्गवर ३०० वर्षांची गणेशोत्सव परंपरा
श्रद्धा, इतिहासाचा संगम : श्री शिवराजेश्वर मंदिर स्थापनेपासूनचा उत्सव
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : अरबी समुद्रात उभारलेला ऐतिहासिक जलदुर्ग ‘किल्ले सिंधुदुर्ग’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार धोरणाचे अन् हुशारीचे प्रतीक आहे. १६६४ ते १६६७ च्या दरम्यान उभारलेला हा किल्ला लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा असण्यासोबतच धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्याही तितकाच समृद्ध आहे. या किल्ल्यावर १६९५ पासून अखंडपणे श्री शिवराजेश्वर मंदिरात ऐतिहासिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
सामान्यतः सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये केली असे मानले जाते, परंतु सिंधुदुर्ग किल्ल्यावर श्री शिवराजेश्वर मंदिराच्या स्थापनेपासून, म्हणजेच १६९५ पासून ही गणेशोत्सवाची परंपरा अखंडपणे जपली गेली आहे. मंदिरात सुरू झालेला हा उत्सव हळूहळू किल्ल्यातील घराघरांत पोहोचला असून आज ३०० हून अधिक वर्षे ही परंपरा अविरत सुरू आहे. किल्ले सिंधुदुर्ग येथे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात, म्हणजेच सन १६९५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव श्री शिवराजेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली. छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी किल्ल्यावर हे मंदिर उभारले.
या मंदिराच्या स्थापनेसोबतच मंदिरात दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. महाराजांच्या मूर्तीसमोर आद्य दैवत श्री गणेशाचे पूजन करून विजय, समृद्धी आणि रक्षणासाठी प्रार्थना केली जात असे. मंदिरात सुरू झालेला हा उत्सव केवळ धार्मिक विधी न राहता, किल्ल्यावरील सैनिकांना, रक्षकांना आणि नागरिकांना एकत्र आणणारे एक मुख्य सांस्कृतिक केंद्र बनले. यातून प्रेरणा घेऊन पुढे किल्ल्यावरील सेवेकरी, शिपाई आणि स्थानिक रहिवाशांनी आपापल्या घरांतही मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली. किल्ले सिंधुदुर्गचे रक्षण आणि मंदिराची निगा राखण्यासाठी शिवकाळात आणि पेशवेकाळात विशिष्ट २२ कुटुंबांची (घराण्यांची) सेवेकरी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. भाद्रपद महिन्यात समुद्राची भरती-ओहोटी, मुसळधार पाऊस आणि निसर्गाची कठीण आव्हाने असतानाही ही २२ कुटुंबे अत्यंत निष्ठेने आणि उत्साहाने हा उत्सव साजरा करत असत.
-----------------
प्रतिकूलतेतही संस्कृतीची जपणूक
मुंबईत स्थलांतरित झालेल्या कुटुंबांनी आपली या गणेशोत्सवाची परंपरा मुंबईतील घरांमध्ये आजही निष्ठेने सुरू ठेवली आहे. किल्ला सोडून गेलेल्या रहिवाशांची मूळ घरे काळाच्या ओघात पडली असून, आज तिथे जुन्या घरांचे अवशेष पाहायला मिळतात. आज येथेल फक्त १० ते १२ घरे उरली आहेत. आव्हानात्मक परिस्थिती असूनही सकपाळ, पाडावे, वायंगणकर, सावंत व इतर काही स्थानिक कुटुंबे आजही किल्ल्यावर वास्तव्यास असून आपली संस्कृतीला जपत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.