Cyclones : वर्षभरात सहा चक्रीवादळांनी घातला धुमाकूळ; नैसर्गिक आपत्तींच्या घटनांतही वाढ

मागील वीस ते तीस वर्षांत वातावरणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींच्या घटनांतही वाढ होत आहे.
cyclone
cyclone sakal

पुणे - बदलत्या हवामानाचा परिणाम काही वर्षांपासून जाणवत आहे. यामुळे अतिवृष्टी, चक्रीवादळे तयार होणे, अवकाळी पाऊस पडणे अशा अनेक घटना वाढत असून चक्रीवादळांच्या संख्येतही वाढ होताना दिसून येते आहे. मागील वर्षात तब्बल सहा चक्रीवादळे तयार झाली होती. विशेष म्हणजे चक्रीवादळाच्या कालावधीतही वाढ होत असून दहा वर्षांच्या काळातील ही सर्वाधिक चक्रीवादळे आहेत.

मागील वीस ते तीस वर्षांत वातावरणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींच्या घटनांतही वाढ होत आहे. त्याचबरोबर दरवर्षी तयार होत असलेल्या चक्रीवादळाच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात मे महिन्यात बंगालच्या उपसागरात मोचा, ऑक्टोबरमध्ये हामून, नोव्हेंबरमध्ये मिधिली, डिसेंबरमध्ये मिगजौम अशी चार चक्रीवादळे तयार झाली होती.

तर अरबी समुद्रात जून महिन्यात बिपोरजाॅय आणि सप्टेंबर महिन्यात तेज अशी दोन चक्रीवादळे तयार झाली होती. वर्षभरातील चक्रीवादळामध्ये सर्वाधिक तीव्र असलेल्यांमध्ये बिपरजॉय वादळ गणले गेले आहे. हे पूर्व-मध्य अरबी समुद्रावर तयार झालेले एक शक्तिशाली आणि अनिश्‍चित उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होते. साधारणपणे सहा ते १९ जून असे एकूण १३ दिवस त्याची तीव्रता होती.

चक्रीवादळासोबत बंगालच्या उपसागराच्या नैॡत्य भागात ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. तर एक ते ३ ऑगस्ट या कालावधीत बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात खोल कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. अरबी समुद्रात ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते.

तर २०२२ मध्ये बंगालच्या उपसागरात ७ ते १२ मे दरम्यान आसनी हे चक्रीवादळ तयार झाले होते. तर ६ ते १० डिसेंबरमध्ये तीव्र मंदोस नावाचे चक्रीवादळ होते. तर बंगालच्या उपसागर, अरबी समुद्र, हिंद महासागरात एकूण १३ कमी दाबाचे, खोल कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये सर्वाधिक चक्रीवादळे तयार झाल्याचे दिसून येते.

चक्रीवादळात वाऱ्यांचा वेग त्याने केलेल्या विध्वंसाचे मुख्य कारण ठरते. या वाऱ्यांमध्ये असलेल्या बाष्पाच्या प्रमाणामुळे चक्रीवादळ जेथून प्रवास करते तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो.

चक्रीवादळाची निर्मिती कशी होते?

समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती चोहोबाजूंनी येणाऱ्या वाऱ्यांमुळे वादळ तयार होते. उष्ण व आर्द्र हवेचा सततचा पुरवठा हे चक्रीवादळाच्या निर्मितीचे प्रमुख कारण आहे. समुद्राचे तापमान हा चक्रीवादळाच्या निर्मितीचा मोठा घटक ठरतो. समुद्रात २६ डिग्री अंश सेल्सिअस तापमान ६० मीटर खोलीपर्यंत असणे, हे त्यासाठी पोषक ठरते.

गेल्या काही वर्षांत हवामानात मोठे बदल होत आहेत. या बदलांमुळे अनेक नैसर्गिक घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये प्रामुख्याने चक्रीवादळात झालेली वाढ हा महत्त्वाचा बदल आहे. मागील वर्षातही सहा चक्रीवादळे तयार झाली आहेत. यात अरबी समुद्रात दोन तयार झाली आहेत.

- डॉ. कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख, भारतीय हवामान विभाग, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com