सोलापुरात दीड कोटी टन ऊसाचे गाळप;    जिल्ह्यातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

सोलापुरात दीड कोटी टन ऊसाचे गाळप; जिल्ह्यातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

Published on

सोलापूर जिल्ह्यात दीड कोटी टन उसाचे गाळप
हंगाम अंतिम टप्प्यात; साखर उतारा घटल्याने कारखान्यांवर आर्थिक संकट
भारत नागणे : सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २४ : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आजअखेर जवळपास १ कोटी ५६ लाख ८२ हजार टन उसाचे गाळप करून १ कोटी ३८ लाख ४९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. दरम्यान, यावर्षी साखर उतारा घटल्याने कारखान्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात ९.९६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे, तर ९.३७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप आणि साखर उत्पादनातील आघाडी यंदाही कायम राखली आहे.
राज्यात सर्वाधिक उसाचे गाळप आणि साखर उत्पादन सोलापूर जिल्ह्यात होते. यावर्षीही सोलापूर जिल्ह्याने ऊस गाळप व साखर उत्पादनातील आघाडी कायम ठेवली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत १८ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे, तर उर्वरित कारखाने येत्या आठवडाभरात बंद होतील अशी शक्यता आहे. दरम्यान, यंदा बहुतांश कारखान्यांना ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने १५ लाख तर अन्य मोठ्या कारखान्यांचे १० लाख टनाच्या आत गाळप झाले आहे. कमी गाळप झालेले असतानाच साखर उतारा देखील कमी मिळाला आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांना सरासरी साखर उतारा ८.९२ टक्के इतका मिळाला आहे. बहुतांश कारखान्यांना अपेक्षित साखर उतारा मिळवता आला नसल्याने साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. प्रत्यक्ष उसाचे गाळप आणि त्यातून मिळालेले साखर उत्पादन याचा विचार केला तर जिल्ह्यात सुमारे १८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. बाजारातील सरासरी एका क्विंटलला ४ हजार रुपयांचा भाव धरला तर सुमारे ७२० कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. साखर तुटीमुळे अनेक कारखान्यांना एफआरपीची रक्कम देताना नाकीनऊ येण्याची शक्यता साखर तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
---
कोट
सोलापूर जिल्ह्यातील या वर्षीचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत १८ कारखाने बंद झाले आहेत. आतापर्यंत दीड कोटी टनाहून अधिक उसाचे गाळप झाले आहे. उसाचे क्षेत्र कमी झाल्याने अपेक्षित गाळप झाले नाही. साखर उतारा देखील कमी मिळाला आहे. त्यामुळे कारखान्यांना त्याचा फटका बसला आहे. परंतु, काही कारखान्यांनी थेट रसापासून इथेनॉल निर्मिती केल्यामुळे त्या कारखान्यांना साखर उतारा कमी आला आहे.
- प्रकाश आष्टेकर, साखर सहसंचालक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com