श्रीनिवास कुलकर्णी श्रद्धांजली लेख

श्रीनिवास कुलकर्णी श्रद्धांजली लेख
Published on

‘निबंधप्रभू’ साहित्यिक
कविता, चित्र आणि अनुभव यांचा सुंदर संगम ज्यांच्या निबंधांत आढळतो, असे
साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने एक महत्त्वाचा साहित्यिक, संपादक आपण गमावला. त्यांना वाहिलेली श्रद्धांजली.
.................................................

मुकेश थळी
सिद्धहस्त ललित निबंधकार श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाची वार्ता काल दुपारी आली. त्यांच्या डोह (१९६५) या गाजलेल्या लोकप्रिय पुस्तकाची आम्ही पारायणे करत निबंधकार म्हणून घडलो. या पुस्तकाला मराठी साहित्य विश्वात भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यांचे निबंध म्हणजे एक वस्तुपाठच.
कुलकर्णी यांच्या चार मुख्य साहित्यकृती आहेत. ‘डोह’ नंतरचं पुस्तक ‘सोन्याचा पिंपळ’. त्यात निसर्गाची विलोभनीय शब्दचित्रे आहेत. ‘पाण्याचे पंख’ या पुस्तकात लहान मुलांच्या भावविश्वाचे विलक्षण चित्रण समाविष्ट आहे, तर ‘कोरडी भिक्षा’मध्ये त व्यक्तिचित्रणात्मक वर्णने आहेत. त्यांचे लेखन मोजके आणि नेटके. मराठी साहित्यविश्वात त्यांची शैली हा एक मानदंडच आहे, असे म्हणता येईल.
श्रीनिवास कुलकर्णी यांचे लेखन महाराष्ट्रापुरतेच न राहता धारवाड, कोलकातापर्यंत पोहोचले. त्यांच्या साहित्याचा इंग्रजी अनुवादही झाला.
‘डोह’ या पुस्तकातील निबंधांनी परमोच्च कलात्मक शिखर गाठले, अशी पावती मराठी समीक्षकांनी दिली. ‘मनातल्या उन्हात’ हा या पुस्तकातील निबंध मनात अक्षरशः रुतून बसणारा आहे. काही वर्षे हा निबंध शाळा कॉलेजच्या अभ्यासक्रमात होता. यात मुलाच्या मनातील विचार, बालस्मृती आणि ऋतूंच्या बदलत्या रंगांचे तरल चित्रण आहे. पुस्तकाचे शीर्षक असलेला ‘डोह’ हा लेख मानवी मनाची खोली आणि नदीच्या डोहातील संथ प्रवाह यांची तुलना करतो. या निबंधाचा अंत:प्रवाह तत्त्वचिंतनात्मक असल्याने हा लेख आपल्याला आगळ्या चिंतनशील पातळीवर घेऊन जातो.
माझे सोलापूरचे कवी मित्र सुनील शिनखेडे म्हणाले, “कवी सुधांशु यांच्या पाठबळाने औदुंबर साहित्य संमेलन ही त्यांचीच प्रेरणा. ते शब्द फार काळजीपूर्वक तपासत. पत्रांतून कवितेवर मार्मिक चर्चा करत. अशी काही पत्रं माझ्याकडे आहेत.” श्रीनिवास कुलकर्णी आणि गोव्याचे कवी शंकर रामाणी यांच्यातील पत्रमैत्र अतिशय घनिष्ट होतं. मी बेळगांवला रामाणींकडे गेलो होतो, तेव्हा त्यांनी कुलकर्णींच्या पत्रांचा फोल्डर दाखवला. मी थोडी वाचली व दुसरा फोल्डर दळवींचा मागितला, कारण ती वाचण्याचं जास्त कुतूहल वाटलं. अनुभव संचिताच्या डोहाचा तळ, पारदर्शक मांडणी व कलात्मक उंची यामुळे त्यांच्या निबंधांची आशयघनता वाचकाला गुंग करते.

त्यांच्या अफाट प्रेमाचा विषय म्हणजे कविता. ते चौथीत असताना त्यांची बालकविता पां.ना.मिसाळ यांच्या ‘बालसन्मित्र’मध्ये प्रकाशित झाली होती. बालकवींच्या प्रतिभेने कविता न लिहिता जर गद्य निवडले असते तर ते लेखन कुलकर्णींचे झाले असते, असे कवी मंगेश पाडगांवकर यांनी म्हटले होते.
‘औदुंबर’चे निसर्गदर्शन त्यांच्या साहित्यात आले. सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण ‘अनाथ विद्यार्थी आश्रम संस्थे’त राहून पूर्ण केले.
श्रीनिवास यांचे आजोबा व वडील दोघेही चित्रकार होते. कुलकर्णी यांनी सुरुवातीला साइन बोर्ड पेंटिंगचा व्यवसाय केला. तसेच ओगलेवाडीच्या काच कारखान्यात हिशेब खात्यात नोकरी केली. त्यानंतर ते ‘मौज’ या प्रकाशन विभागात संपादक म्हणून कार्यरत होते.
कुलकर्णींचे निबंध वाचताना कविता वाचल्यासारखे वाटतात; शब्दांतून निसर्गाची आणि जीवनाची चित्रमय सृष्टी उभी राहते. लहान वाक्यांतून अर्थसघन आशय व्यक्त करण्याची ताकद. निसर्गाच्या रूपकळेला नित्यनूतन शब्दकळेतून साकार करण्याची अद्वितीय प्रतिभा त्यांच्याठायी होती. ऋतू, वातावरण, निसर्गातील सूक्ष्म बदल यांचे संवेदनशील चित्रण त्यांनी केले आहे.
तरल संवेदनशीलता
काव्यात्मकता, तरल संवेदनशीलता आणि चित्रमय शैली ही कुलकर्णींच्या निबंधांची ठळक वैशिष्ट्ये. निसर्गाशी तादात्म्य साधून त्यांनी शब्दांतून जीवनाचे सूक्ष्म अनुभव व्यक्त केले. लहान वाक्यांतून अर्थसघन आशय मांडण्याची त्यांची ताकद भारावून टाकणारी आहे. निसर्गाचे रूपक आणि मानवी भावविश्वाचे सूक्ष्म चित्रण ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या निबंधांत कविता, चित्र आणि अनुभव यांचा सुंदर संगम दिसतो. त्या अनुभवनिधानाचा आवाका म्हणजे प्रचंड खोलीचा अनाकलनीय `डोह’.
.................................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com