पुण्यात ‘एनएसडी’चे उपकेंद्र शक्‍य - सुरेश शर्मा

suresh sharma
suresh sharma
Updated on

पुणे - ‘‘प्रत्येक राज्यात ड्रामा स्कूल हवे, अशी मागणी होते. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा. आमची काही राज्यांत एनएसडीची उपकेंद्रे आहेत. पुण्यासह आणखी काही ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहेत. महाराष्ट्रात नाट्य चळवळ मोठी आहे. या ठिकाणी केंद्र होऊ शकेल; पण त्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढे यायला हवे,’’ असे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे (एनएसडी) संचालक सुरेश शर्मा यांनी स्पष्ट केले.  

सुरेश शर्मा आणि आयपार संस्थेचे संचालक, नाट्यकर्मी प्रसाद वनारसे यांनी आज ‘सकाळ’ला भेट दिली. शर्मा म्हणाले, ‘‘पूर्वी मनोरंजनाची साधने कमी होती. रंगमंच त्या वेळी प्रभावशाली होते. त्यामुळे नाटके अन्य भाषांमध्ये होत होती; परंतु आता मनोरंजनाची अनेक माध्यमे तयार झली आहेत. परंतु एनएसडी यासाठी काम करीत आहेत. अनेक भाषांमधील नाटके इंग्रजीमध्ये भाषांतरित केली जात आहेत.’’

तर कलाकाराला सशक्त करा!
एनएसडीतून बाहेर पडणारे कलाकार हे चित्रपटांमध्ये अधिक रमतात, या प्रश्‍नावर शर्मा म्हणाले, ‘‘या कलाकारांमुळेच सिनेमा समृद्ध झाला आहे. दुसरे म्हणजे रंगकर्मीलाही संसार असतो, मुले असतात. त्यालाही घर घ्यायचे असते. त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो सिनेमामध्ये गेला, तर बिघडले कुठे? आपण सिनेमा पाहायला जातो, त्या वेळी कुटुंबासाठी दीड हजार खर्च करतो; परंतु नाटकाच्या तिकिटासाठी शंभर रुपये देताना भीक दिल्यासारखे देतो. जर रंगकर्मीने रंगमंचावरच राहावे, असे वाटत असेल, तर कलाकाराला समाज आणि सरकारनेही आर्थिक सशक्त केले पाहिजे.’’

वेब सीरीज हे नवे माध्यम निर्माण झाले आहे, त्याचा नाटकांना अजिबात धोका नाही. त्याउलट कलाकारांसाठी ही एक संधीच आहे. तसेच नव्या तरुणांनादेखील या क्षेत्रात पदार्पणाचा नवा मार्ग तयार झाला आहे, असे मत व्यक्त करतानाच नाटक हे व्यक्तिमत्व समृद्ध करणारे माध्यम आहे. त्यामुळे संगीत, चित्रकला याप्रमाणे हाही विषय अभ्यासक्रमात पाहिजे; परंतु अद्याप तसे घडताना दिसत नाही. गोवा, दिल्ली या राज्यांनी हा प्रयोग केला आहे. सर्वच राज्यात हे घडले पाहिजे, अशी अपेक्षा शर्मा यांनी व्यक्त  केली. 

एफटीआयआय चालना देणार
नाट्य लेखनाला चालना देण्यासाठी आम्ही कार्यशाळा घेत आहोत. पुण्यात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीबरोबर आम्ही ही कार्यशाळा घेतली. नवे लेखक घडावेत, हाच उद्देश आहे. ‘एफटीआयआय’चे संचालक भूपेंद्र कॅंथोला यांच्याबरोबर यासंबंधी चर्चा केली आहे. तेही संस्थेबाहेर काही कार्यशाळा घेणार आहेत. यातून नाट्य आणि अभिनय चळवळींना चालनाच मिळेल, असे शर्मा म्हणाले.

अज्ञानातून विरोध
नागरिक सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यामुळे देशांतर्गत कुणाला धोका नाही; परंतु अभ्यास न करताच सर्वत्र त्याला विरोध होत आहे. कायद्यामुळे परिणाम होणारे लोक अत्यल्प आहेत. परंतु त्यांच्या आडून राजकारण केले जात आहे, असे मत सुरेश शर्मा यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com