

जिल्ह्यात साखर निर्मिती एक कोटी क्विंटलवर
हंगामाची सांगता; १७ कारखान्यांत एक कोटी आठ लाख टन ऊसगाळप
विकास जाधव ः सकाळ वृत्तसेवा
काशीळ, ता. १० : जिल्ह्यातील सर्वच १७ साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची सांगता झाली. या कारखान्यांकडून एक कोटी आठ लाख ४९ हजार ९९१ टन उसाचे गाळप होऊन एक कोटी सात ५७ हजार ३० क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. सरासरी ९.३१ टक्के उतारा मिळाला आहे. सहकारी कारखान्यांनी साखर निर्मिती व उताऱ्यात, तर खासगी कारखान्याने गाळप आघाडी ठेवली आहे.
जिल्ह्यातील नऊ सहकारी व आठ खासगी कारखान्यांनी ऊसगाळप केले आहे. जिल्ह्यात जरंडेश्वर कारखान्याने सर्वाधिक १९ लाख १५ हजार १६६ मेट्रिक टन इतके सर्वाधिक गाळप केले असून, १६ लाख ३५ हजार १०० क्विंटल साखरनिर्मिती जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. साखर उताऱ्यास अजिंक्यतारा कारखान्याची आघाडी असून, या कारखान्यास सरासरी १२.६६ टक्के उतारा मिळाला.
गाळपात ‘खासगी’ची आघाडी, मात्र उताऱ्यात घट
या हंगामात सहकारी कारखान्याबरोबर खासगी कारखान्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत मोठ्या प्रमाणात गाळप केले. या सात खासगी कारखान्यांनी ५९ लाख ९० हजार ९१३ टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे ५२ लाख ३२ हजार ६१५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. मात्र, खासगी कारखान्यांचा साखर उताऱ्यात घट झाली आहे. खासगी कारखान्यांचा सरासरी ८.७३ टक्के साखर उतारा मिळाला आहे. याउलट सहकारी कारखान्यांची परिस्थिती आहे. सहकारी साखर कारखान्यांनी ४८ लाख ५९ हजार ७८ टन उसाचे गाळप करत ५५ लाख २४ हजार ४१५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे, तर सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी ११.३७ टक्के साखर उतारा मिळाला आहे. साखर उतारा चांगला मिळत असल्याने सहकारी कारखान्यांनी कमी गाळप करत जास्त साखर निर्मिती केली आहे.
चार महिने चालला हंगाम
जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यांच्या सुरुवातीस सुरू झाले होते. दुष्काळी तालुक्यांसह सर्वत्र ऊस लागवड झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊस गाळपास उपलब्ध झाला.
मात्र, साखर कारखान्यांची वाढलेली संख्या व वाढलेली क्षमता यांचा परिणाम हंगामावर दिसून आला आहे. हा हंगाम अवघा चार महिने सुरू राहिलेला आहे. मात्र, चार महिने गाळप हंगाम चालला असलातरी साखर निर्मितीत कोटीची उड्डाणे घेतली आहेत.
बिलांना उशीर
ऊस हंगामाचे दर लवकर निश्चित झाल्यामुळे आंदोलने झाली नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस तुटल्यावर १४ दिवसांत खात्यावर बिल जमा करण्याची कायदेशीर जबाबदारी कारखान्यांची असते. मात्र, हा नियम बहुतांश कारखान्यांनी पाळलेला दिसत नाही. अनेक कारखान्यांची बिले एक ते दीड महिना उशिरा दिल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज व इतर कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड सोसावा लागला आहे. हंगाम संपत आल्यावर अखेरची बिले येण्यासही उशीर होता. मार्च महिन्यात पीक कर्ज नवी-जुनी करावी लागत असल्याने पुढील आठ ते दहा दिवसांत सर्व बिले वेळेत जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
चौकट
गळीत हंगाम दृष्टिक्षेपात
- अजिंक्यतारा कारखान्यांचा सर्वाधिक १२.६६ टक्के साखर उतारा
- सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी ११.३७ टक्के साखर उतारा
- जरंडेश्वर कारखान्याला सर्वाधिक गाळप व साखरनिर्मिती
- खासगी कारखान्यांकडूनही मोठ्या प्रमाणात गाळप
- कारखान्यांनी प्रतिटन ३३०० ते ३५०० रुपये यादरम्यान दर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.