
बारामती : केंद्र सरकार किंवा भाजपच्या विरोधात काही बोलले तर काहीतरी कटकारस्थान ते करतातच, सत्तेचा गैरवापर कसा करायचा असतो आणि दडपशाही कशी वाढवायची याचे आणखी एक जिवंत उदाहरण म्हणजे एका चँनेलवर बंदी आणणे हे आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बारामतीत एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही भावना बोलून दाखवली. एका चँनेलवर 72 तासांची बंदी आणण्याच्या प्रकाराला न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे चाप बसला, या बाबत प्रश्न विचारला असता सुळे यांनी वरील प्रतिक्रीया व्यक्त केली.
बारामतीत सुनेत्रा पवार तुमच्या विरोधात खासदारकीची निवडणूक लढविणार अशी चर्चा आहे, या बाबत विचारता त्या म्हणाल्या, आमच्याकडून तरी लोकशाही आहे, आता दिल्लीत काय दडपशाही चालते हे संपूर्ण देश पाहतो,
पण आमच्याकडून लोकशाहीच आहे, मला अस वाटत की कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच आहे, आपण सर्वांनीच या गोष्टीचा मानसन्मान करायला हवा, तीन वेळा भाजप माझ्याविरोधात लढला आहे, याही वेळेस कोणीतरी लढणारच, लोकशाहीचे मी मनापासून स्वागत करते, ही लोकशाही जगली टिकली पाहिजे, त्या मुळे सर्वांनीच अशा निर्णयाचे पूर्ण ताकदीने स्वागत करायला हवे.
मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाच्या अनेक वर्षांच्या मागण्या आहेत, पाच दिवसांच्या संसदेच्या अधिवेशनात एक दिवस किमान या आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा ठेवायला हवी होती, महागाई बेरोजगारी या वर चर्चा झाली नाही, पाच दिवसांचे अधिवेशन चारच दिवसात गुंडाळले, ही बाब दुर्देवी आहे. स्वस्वार्थासाठी जुमलेबाजी केली गेली, लोकांच्या पदरात या अधिवेशनातून काहीही पडलेले नाही.
दुष्काळ, बेरोजगारी, महागाई यात बारामती लोकसभा मतदारसंघासह राज्यासमोर विविध आव्हाने आहेत, काश्मिर, मणीपूरच्या प्रश्नाबाबत गंभीर स्थिती आहे, मोठी आव्हाने असताना भाजप जी कटकारस्थान करतो त्याचे मला काहीही आश्चर्य वाटत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडवून मतदार जे बोलले त्या बाबत विचारले असता त्या म्हणाल्या की आता सर्वांनीच नागपूरकांच्या मदतीला धावून जायला हवे, एक मात्र नक्की भाजपचे नेतृत्व पक्ष फोडणे, घर फोडणे, एजन्सीचा वापर यात इतके मग्न असतात, की त्यांना विकासासाठी वेळच नाही.
देवेंद्र फडणवीस जालन्याच्या घटनेच्या वेळेस प्रचाराला गेले होते, गाडी अडविणे करु नये, ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा मानसन्मान व्हायला हवे, मात्र देवेंद्रजींनी पक्ष फोडण्याऐवजी विकासाकडे दिला असता तर कदाचित नागपूरकरांवर हा दिवस आला नसता.
मला जुनी संसद आवडते....
या देशाचा सगळा इतिहास जुन्या संसदेच्या वास्तूत आहे. त्या भिंती बोलक्या आहेत, पं. जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील अशा अनेक थोर व्यक्तींची परंपरा आहे, 15 ऑगस्टचे पं. नेहरुंचे भाषण आजही सर्वांच्या लक्षात आहे. स्वातंत्र्याचा सर्व लढा या वास्तूने पाहिलेला आहे, त्या मुळे माझ्या दृष्टीने त्या वास्तूशी माझ भावनिक नात आहे. या वास्तूत आम्ही अनेक दिग्गजांकडून काहीतरी शिकलो आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.