...तर स्वप्नीलचा जीव वाचला असता; आईची भावूक प्रतिक्रिया

कोरोनाकाळात निवडणुका होतात मग मुलाखती का नाही? स्वप्नीलच्या पालकांचा सवाल
...तर स्वप्नीलचा जीव वाचला असता; आईची भावूक प्रतिक्रिया

केडगाव : ''माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर सरकारला जाग आली आहे. हे दुर्देव आहे. सरकारने घेतलेले निर्णय आठ दिवसापुर्वी घेतले असते तर स्वप्नीलचा जीव नक्की वाचला असता. कोरोनाच्या काळात निवडणुका होऊ शकतात मग एमपीएससीच्या मुलाखती का होऊ शकत नाही. सरकार कारणे देत असल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे.'' अशी खंत स्वप्नील लोणकरचे वडील सुनील व आई छाया यांनी व्यक्त केले.

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न लागल्यामुळे आत्महत्या केलेल्या स्वप्नील सुनील लोणकर याच्या कुटुंबियांची मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी केडगाव ( ता.दौंड ) येथे भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दोन लाख रूपयांचा धनादेश ठाकरे यांनी लोणकर कुटुंबियांना दिला.

स्वप्नील लोणकर हा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. कोरोनामुळे त्याची मुलाखत न झाल्याने नियुक्ती होत नव्हती. वय वाढत असल्याने नैराश्यामधून त्याने बुधवारी फुरसुंगी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. लोणकर कुटुंबिय हे मुळचे केडगावचे. स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्नील हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूचे विधानसभा अधिवेशनातही पडसाद उमटले. यावेळी मनसे नेते राजेंद्र वागस्कर, मनसेचे उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटसकर, गजानन काळे, सचिन कुलथे, राजू चातू, प्रजोत वाघमोडे, प्रितम वलेचा, सुनील नवले, नीलेश वाबळे, पोपट सुर्य़वंशी, संतोष भिसे, मंगेश साठे, अविनाश गुढाटे, राष्ट्रवादीचे तुषार थोरात, दिलीप हंडाळ आदी उपस्थित होते.

यावेळी अमित ठाकरे म्हणाले, ''घडलेली घटना ही दुर्देवी आहे. लोणकर कुटुंबियांच्यामागे संपुर्ण मनसे पक्ष उभा आहे. कोणतीही मदत लागली थेट फोन करा. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जाईल.''

स्वप्नीलचे वडील सुनील व आई छाया लोणकर म्हणाल्या, ''स्वप्नीलला लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती. सनदी अधिकारी तुकाराम मुंडे व पोलिस आयुक्त विश्वास नांगरेपाटील यांचा त्याच्यावर प्रभाव होता. लहानपणी वाढदिवसाला मिळालेल्या पैशातून तो गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देत असत. माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर सरकारला जाग आली आहे. हे दुर्देव आहे. सरकारने घेतलेले निर्णय आठ दिवसापुर्वी घेतले असते तर स्वप्नीलचा जीव नक्की वाचला असता. एमपीएससीच्या मुलाखती घेऊन जागा भरणे हीच स्वप्नीलला श्रद्धांजली ठरेल. आमचा म्हातारपणाचा आधार गेला आहे. कोणत्याही विद्यार्थ्याने तणावात न राहता टोकाचा निर्णय घेऊ नये. नोकरी नाही मिळाली तरी चालेल काहीही व्यवसाय करून चटणी भाकरी खाऊ.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com