पुणे ः"कोरोनानं कहर केला आहे. पुणं वाचलं पाहिजे. पुण्यात 20 भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असूनही समन्वयभावी त्यांचा काहीच उपयोग होत नाहीयं. त्यामुळे आता केंद्र सरकारनंच टास्क फोर्स पाठवून पुण्यात समन्वय निर्माण करून कोरोनाचा उद्रेक कमी केला पाहिजे,'' अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत चर्चेदरम्यान सोमवारी केली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संसदेच्या अधिवेशनात सोमवारी बापट म्हणाले, "पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी), उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात देशात पहिल्या स्थानावर पुणं आहे. मात्र, आता कोरोनाच्या रुग्ण संख्येतही पुणे पहिल्या स्थानावर पोचलं आहे. हा पहिला क्रमांक आम्हाला नको आहे. रोज हजार-दीड हजार नवे रुग्ण सापडत आहेत. 60-70 लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पुण्यात नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. या शहरात व्हेंटिलेटर मिळत नाही, ऑक्सिजन बेड रुग्णालयात उपलब्ध होत नाहीत. रुग्णवाहिकांची टंचाई आहे. पुण्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती तातडीने बदलण्याची गरज आहे.''
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने पुण्यात 20 आयएएस अधिकारी नियुक्त केले आहेत. पण, त्यांचा त्यांच्यात ताळमेळ अन् समन्वय नाही. त्याचे परिणाम पुणेकर नागरिकांना भोगावे लागत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारनं आता लक्ष घातलं पाहिजे. त्यासाठी दिल्लीतून पुण्यात टास्क फोर्स पाठविला पाहिजे. हा फार्स पुण्यात समन्वय निर्माण करेल. त्यातून कोरोनाचा उद्रेक कमी होईल, असेही बापट यांनी सांगितले. यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशीही मागणी त्यांनी केली.
आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे!
पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या अडीच लाखांपेक्षा जास्त झाली आहे. रविवारी (ता. 20) दिवसभरात 3 हजार 667 रुग्ण नव्याने सापडले आहेत. त्यामध्ये पुणे शहरातील रुग्णांची संख्या 1 हजार 700 आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 749, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 869, नगरपालिका क्षेत्रात 283 तर, कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 66 नवे रुग्ण सापडले आहेत. रविवारी दिवसभरात 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात 24 तासांत 3 हजार 153 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांत पुणे शहरातील 1 हजार 545 रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 251 तर, जिल्ह्यातील 168 रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 3 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. आत्तापर्यंत 5 हजार 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांत जिल्ह्याच्या बाहेरील 204 रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.