
बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या, बोकड ठार
निरगुडसर, ता. २३ ः रांजणी (ता. आंबेगाव) येथील पळस मळ्यात शुक्रवारी (ता.२३) दिवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शांताराम रामभाऊ वाघ यांच्या तीन शेळ्या व एक बोकड ठार झाला. दीड वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करून तीन शेळ्या व एका बोकडाला जागीच ठार केले. तसेच एका बोकडाला तो फरफटत ओढत असताना बोकडाच्या ओरडण्याचा आवाज आल्याने शेतकरी शांताराम रामभाऊ वाघ हे घराबाहेर पळत आले.त्यावेळेस बिबट्याने बोकडाला सोडून चिकूच्या बागे पलीकडे धूम ठोकली.त्यामध्ये एक बोकड जखमी झाला आहे. यामध्ये शांताराम रामभाऊ वाघ यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला.
रांजणी येथील कारमळा येथे सात दिवसांपूर्वी ऊसतोड सुरू असताना दोन बछडे सापडल्याची घटना घडली होती. वनविभागाने ते बछडे त्याच ठिकाणी ठेवल्यानंतर त्याच दिवशी रात्री बिबट मादी आपल्या पिल्लांना सुखरूप घेऊन गेली. त्यामुळे परिसरात मादी सह बछड्यांचा वावर आहे तसेच परिसरात बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..