
वाहनचोरी वाढली; फिर्याद एकाचीच
आळंदी, ता. २४ : शहरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांच्या डायरीला अवघ्या एकाच गाडीचोरीची तक्रार गेल्या महिनाभरात नोंद आहे. गाडीमालक फिर्याद नोंदवायला गेल्यावर आळंदी पोलिस ठाण्यातील हवालदार प्राथमिक स्तरावर फिर्याद घेण्यास नकार देत असल्याचे चित्र आहे.
आळंदीत मोबाईल चोरी, गॅस सिलिंडर चोरी, गाडी चोरीचे प्रमाण वाढले. नागरिक चोरांच्या सुळसुळाटामुळे हैराण झालेत. भाजीमंडईत गेले की, महिलांचा मोबाईल हमखास चोरी होणारच. नदीकाठी भाविक तीर्थस्नानासाठी गेला की हमखास कपडे आणि पैसे चोरी होणारच. आता दुचाकी चोरीचे प्रकरण वाढले आहे.
प्रताप गायकवाड यांची दुचाकी तीन आठवड्यापूर्वी चोरी झाली. लेखी तक्रार दिली. त्याची पोहोच अद्याप दिली नाही. फिर्याद नोंदविली नसल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. अशाचप्रकारे अन्य लोकांच्या वाहनचोरीबाबत पोलिस तक्रार नोंदवून घेत नसल्याचे चित्र आहे. वाहनचोरीला गेले आणि तक्रार नोंदवायला गेल्यावर तेथील हवालदार आधी दोन दिवस आजूबाजूला शोधून पहा असा अनाहूत सल्ला देतात. गाडी नाही मिळाली तर मग फिर्याद घेऊ असे म्हणून तक्रारदारास पिटाळून लावतात. दोन महिन्यात आणखी चार गाड्या चोरीला जाऊनही पोलिस दाद देत नसल्याचे चित्र आहे. फेब्रुवारीतील निवृत्ती ढोले यांच्या वडगाव रस्त्यावरील घराजवळून गाडीचोरीची शेवटची फिर्याद आळंदी पोलिस ठाण्यात नोंद आहे. त्यानंतर मात्र वाहनचोरीची नोंद नसल्याचे चित्र आहे.
बऱ्याचदा गाडी मालकाजवळ कागदपत्रांची उपलब्धता नसते. इंजिन नंबर, चासी नंबर बाबत खात्री झाली की फिर्याद नोंदवून घेतो. शनिवारी सर्व चोरीच्या फिर्याद नोंदवून घेतल्या आहेत.
ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, आळंदी ठाणे
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..