कारेगाव येथील पाणी प्रश्‍न मिटणार

कारेगाव येथील पाणी प्रश्‍न मिटणार

शिरूर, ता. १५ ः नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कारेगाव (ता. शिरूर) या रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील वेगाने विकसित होत असलेल्या गावासाठी स्वयंपूर्ण नळपाणीपुरवठा योजनेची भेट मिळाली आहे. गावच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली असून, या योजनेसाठी सुमारे ३३ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जलशुद्धीकरणाबरोबरच; अद्ययावत पाणी योजना उभी राहणार आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत कारेगाव येथील पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतल्यानंतर नवीन सुधारित नळपाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुभाष भुजबळ, अधिक्षक अभियंता अविनाश रहाणे, शिरूर - आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्‍वास कोहकडे, उद्योजक शुभम नवले, कारेगावचे उपसरपंच संदीप नवले, नागेश शेलार, संदीप गवारे आदी यावेळी उपस्थित होते.
स्थानिक गावकारभारी व परिसरातील पदाधिकाऱ्यांनी कारेगाव येथे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या आवश्‍यकतेबाबतची वस्तुस्थिती बैठकीत मांडली. त्यानंतर योजनेला मंजुरी देण्यात आली. तत्पूर्वी वळसे पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. या योजनेच्या मंजुरीचा प्रस्ताव मंत्रालयात सादर झाल्यानंतर लगेचच प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाईल, असे आश्‍वासन वळसे पाटील यांनी दिले.

कारेगावला सध्या रांजणगाव एमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेतून पाण्याचा पुरवठा होतो. स्थानिक लोकसंख्येबरोबरच वाढते औद्योगीकरण, नागरीकरण, वाढलेली लोकसंख्या आणि छोट्या - मोठ्या उद्योगांचे वाढते जाळे यामुळे पाण्याची गरज वाढली होती. मात्र, त्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता नसल्याने टंचाई जाणवायची. नव्याने होणाऱ्या योजनेनंतर कारेगावचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटेल.
-मानसिंग पाचुंदकर पाटील, अध्यक्ष, शिरूर - आंबेगाव मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस

कारेगावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी प्रथमच एवढा भरीव निधी मिळत असून, शासनाने ही कारेगावकरांसाठी दिलेली नववर्षाची भेटच आम्ही मानतो. निधी मंजुरीमुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. येत्या वर्षभरात या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठीचे नियोजन केले जाईल. योजनेच्या पूर्णत्वानंतर कारेगावातील प्रत्येक घरात शुद्धीकरण केलेले पाणी देण्याबाबत ग्रामपंचायतीमार्फत नियोजन केले जाईल.
-निर्मला शुभम नवले पाटील, सरपंच, कारेगाव (ता. शिरूर)

35444

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com