गुंजवणी प्रकल्प जुन्या सर्वेनुसार होण्यास तत्त्वतः मान्यता

गुंजवणी प्रकल्प जुन्या सर्वेनुसार होण्यास तत्त्वतः मान्यता

Published on

वाल्हे, ता. ३१ : गुंजवणी सिंचन प्रकल्प १९९३मध्ये ठरविलेल्या गावांतूनच नेऊ तसेच एकरी दीड लाख रुपये वसूल करून ठिबक पद्धतीने शेतकऱ्यांना पाणी देण्याऐवजी गावातील पाणीसाठे प्रवाही पद्धतीने भरून देऊ, असे आश्वासन राज्याच्या जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी पुरंदरच्या शिष्टमंडळास दिले. यामुळे गुंजवणीचे पाणी आता जेऊर-मांडकी-थोपटेवाडी याऐवजी हरणी, वाल्हे, राख गावांच्या जिरायती क्षेत्रात खळखळणार असल्याने वाल्हे परिसरातील शेतकऱ्यांचा हा विजय मानला जात असून जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाल्ह्याच्या परिसरामध्ये गुंजवणी प्रकल्पातून जलसंधारण विभागाने जुन्या सर्वेनुसार काम न करता नीरा नदीच्या काठाने हरित पट्ट्यामधून ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. याला कडाडून विरोध करत वाल्हेकरांनी गुंजवणीचे काम बंद पाडले होते. त्याकामासंदर्भात मध्यंतरी वाल्हे येथे बैठक झाल्यानंतरही पर्याय निघाला नव्हता. मात्र, आज जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखाली पुरंदरचे शिष्टमंडळ जलसंधारण विभागाच्या मुख्यअभियंत्यांना भेटले. यावेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी पूर्वीच्या सर्वेनुसार काम सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शवित या कामाला तत्त्वतः मान्यता दिली असल्याची माहिती बाळासाहेब राऊत यांनी दिली. यावेळी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, माणिक झेंडे, सुदामआप्पा इंगळे, पुष्कराज जाधव, हेमंतकुमार माहूरकर, सरपंच अमोल खवले, दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण आदि उपस्थित होते.
गुंजवणी प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईनद्‍वारे पुरंदर तालुक्यातील तोंडल ते वाल्हे, राख या परिसरामध्ये ठिबक सिंचनातून शेतीला पाणी पुरविण्याचा भारतातील पहिला सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहे.
याबाबत बोलताना प्रा. दुर्गाडे म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून वाल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उताऱ्यांवर गुंजवणीचे शिक्के पडलेले आहेत. या बाधित शेतकऱ्यांनाच डावलल्याने या प्रकल्प विरोधात आंदोलन उभे करून शेतकऱ्यांनी काम बंद पाडले आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनंतर आज जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी भारतातील पहिल्या महत्त्वाकांक्षी या योजनेसंदर्भातील त्रुटी मुख्य अभियंत्यांना दाखवून दिल्यानंतर मुख्य अभियंता गुणाले यांनी सदर योजनेच्या मुळ आराखड्यानुसार त्याष्टीने काम सुरू करण्यास तत्त्वतः मान्यता दिली.’’
गुंजवणी योजनेची आलेली पाइपलाइन थांबविलेल्या कामापासून पुढे जुन्या सर्वेनुसार वापरण्याचे नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांना आदेश देण्यात आले. गुणाले यांच्या आश्वानुसार गुंजवणीचे पाणी पाईपलाईनद्वारे बंदिस्त स्वरूपात येणार आहे.
शेतकऱ्यांना समान पद्धतीने पाणी मिळणार आहे. मात्र ते एकरी २० हजार ८०० लिटर न देता वाढवून द्यावे अशी ही मागणी शेतकऱ्यांनी केली. यासंदर्भात गुणाले यांनी याला मान्यता दिली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदामंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होऊन अंतिम निर्णय घेऊ असा विश्वास गुणाले यांनी दिला. यावेळी गुंजवणीच्या नारायणपूर सिंचन योजनेबाबतही चर्चा झाली असल्याचे दुर्गाडे यांनी सांगितले.

‘ठिबक’चा पर्याय पुढच्या टप्प्यात
ठिबक सिंचनाद्वारे एकरी दीड लाख रुपये आकारून शेतकऱ्यांना पाणी दिले जाणार होते. त्यात बदल करून त्या त्या गावातील पाणी साठे भरून दिले जाणार आहेत. ठिबक सिंचनाचा पर्याय पुढच्या टप्प्यात राबविला जाणार आहे, अशी माहिती प्रा. दुर्गाडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com