चाकण- वासुली फाटा मृत्यूचा मार्ग
रूपेश बुट्टे : सकाळ वृत्तसेवा
आंबेठाण, ता. १२ : चाकण- वासुली फाटा (ता. खेड) मार्गावर मागील बारा दिवसांत चार अपघात झाले असून, त्यात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत्यू झालेले तीनही तरुण स्थानिक असून, तिघेही आई-वडिलांना एकुलते एक होते. रस्त्यांची अपूर्ण कामे, दिवसागणिक वाढत असलेली वाहतूक, मोठ्या आणि अवजड वाहनचालकांकडून होत असलेली बेदरकार वाहतूक, अशा अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
बिरदवडी येथे ३१ मे रोजी अपघात झाला. त्यात कोरेगाव खुर्द येथील कडूसकर परिवारातील १७ वर्षीय दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर या मार्गावर पुन्हा दोन अपघात झाले. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. त्यानंतर मंगळवारी (ता. १० जून) भांबोली येथे पुन्हा अपघात झाला. त्यात कुरकुंडी येथील २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांपूर्वी या तरुणाचे लग्न ठरले होते.
अतिक्रमण, पार्किंगमुळे धोका
चाकण ते वासुली फाटा या मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गाळे झाले असून, त्याच्या पुढे गाड्या उभ्या असतात. त्यामुळे रस्ता लहान ठरत आहे. भांबोली येथे झालेल्या अपघाताच्या ठिकाणी अनेक व्यावसायिक गाळे असून, त्यापैकी काहींनी अगदी रस्त्यावर अतिक्रमण करीत दुकाने उभारली आहे. त्यांच्याकडे येणारे अनेक ग्राहक रस्त्यावर गाड्या उभ्या करतात. या अपघाताच्या ठिकाणी असणाऱ्या कंपन्यांत येणाऱ्या गाड्यासुद्धा रस्त्यावर पार्किंग केल्या जातात. त्यामुळे या भागात रस्ता वाहतुकीला अपुरा मिळतो. एका बाजूला कंपन्यांच्या गाडी पार्किंग आणि दुकानदारांची अतिक्रमणे, तर दुसऱ्या बाजूला खोलगट भाग असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
एमआयडीसी- बांधकाम विभागाची टोलवाटोलवी
चाकण- तळेगाव रस्त्याची अवजड वाहतूक या मार्गाने होत असल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात, परंतु वाहतूक मात्र एमआयडीसीत येणाऱ्या मोठ्या वाहनांची होत आहे. दोघांच्या टोलवाटोलवीत बळी मात्र सर्वसामान्य नागरिकांचा जात आहे. एमआयडीसीने त्यांचे रखडलेले रस्ते पूर्ण करणे गरजेचे असून, खराब रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपली जबाबदारी न टाळता रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण करावी. गरजेच्या ठिकाणी गतिरोधक करावेत आणि रस्त्याच्या कडेला झालेली अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे हा रस्ता मोकळा श्वास घेईल. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमआयडीसी यांनी एकत्रित प्रयत्न करून यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. वाहनचालकांनी विशेषतः दुचाकी चालकांनी देखील नियमांचे पालन करून प्रवास करणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.