पिंपळसुटी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

पिंपळसुटी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

आंधळगाव, ता. १४ : पिंपळसुटीसह (ता. शिरूर) परिसरात सोमवारी (ता. १३) वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. यावेळी दुचाकीवरून निघालेला किशोर सुरेश चव्हाण हा दूध उत्पादक शेतकरी गारांच्या मारामुळे जखमी झाला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी (ता. १३) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह वळवाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक झालेल्या गारपिटीमुळे ऊस, केळी, पेरू, डाळिंब, चारापिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

लिंबाच्या आकाराच्या गारांमुळे डाळिंब व पेरू अक्षरश: फुटले आहेत. नुकसानीचे तातडीने पंचनामे व्हावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत मिळावी अशी मागणी ऋषी फराटे, काका मोहिते, विष्णुपंत वाबळे यांनी केली आहे. मांडवगण, इनामगाव, पिंपळसुटी, कुरुळी, आंधळगाव परिसरात घरासमोर लावलेली नारळाची झाडे काही ठिकाणी घरावर तसेच घराच्या अंगणात कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.


विद्युत तारा व खांब जमीनदोस्त
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील इनामगाव, पिंपळसुटी, मांडवगण फराटा, वडगाव रासाई, आंधळगावसह परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत तारा व खांब कोसळल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी विद्युत रोहित्रावर मोठी झाडे पडल्याने अनेक विद्युत खांब कोसळून जमिनीत दोस्त झाले. महावितरणने तत्परता दाखवून वीजपुरवठा खंडित केल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

जुनी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली
मांडवगण येथील मनोज तात्यासाहेब फराटे यांच्या घराजवळील तब्बल २० वर्षांचे आंब्याचे झाड कोसळले. तसेच त्यांच्या घराजवळील गायीच्या गोठ्यावर नारळाचे झाड कोसळले. या घटनेत त्यांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले असून गोठ्यात बांधलेली गाय मात्र थोडक्यात बचावली. मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा असल्याने परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले होते.

तरकारी पिकांचे मोठे नुकसान
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात तरकारी पिके घेतली जातात. यात प्रामुख्याने दोडका, कारले, मिरची, वांगे, टोमॅटो आदी पिकांचा समावेश आहे. तरकारी पिकांना शेतकऱ्यांनी बांबूच्या साह्याने आधार दिला होता. मात्र वादळी वाऱ्याने तरकारी पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

अधिकारी बांधावर फिरकले नाहीत
वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतानाही निवडणूक असल्याचे कारण देत तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी मात्र दिवसभर शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com