पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

आंधळगाव, ता. १५ : ‘‘शिरूर तालुक्यात वळवाच्या पावसाने वादळी वारा व गारांसह हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. नुकसानग्रस्त शेतीचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करावे,’’ अशी सूचना आमदार अशोक पवार यांनी प्रशासनाला केली.

शिरूरच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा, गणेगाव दुमाला, तांदळी, इनामगाव, पिंपळसुटी परिसरात डाळिंब, केळी, ऊस व तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच घर व पोल्ट्री शेडवरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील नुकसानग्रस्त शेतीची आमदार अशोक पवार यांनी पाहणी केली. यावेळी पवार बोलत होते. यावेळी घोडगंगा कारखान्याचे संचालक संभाजी फराटे, दत्तात्रेय फराटे, शंकर फराटे, रावसाहेब जगताप, मारुती घाडगे, राजेंद्र जगताप, सुनील जगताप आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘शिरूर तालुक्यात अनेक गावात वळवाच्या पावसामुळे डाळिंब ऊस, केळी, पोल्ट्री पत्राशेड व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निवडणुकीच्या कामकाजामुळे प्रशासकीय अधिकारी सध्या व्यस्त असले तरीही येत्या दोन दिवसात महसूल प्रशासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत. तोडणीस आलेले अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब वादळी वाऱ्याने गळून पडले आहे. वादळी वाऱ्याने डाळिंब पिकातील क्रॉपकव्हर देखील फाटले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करून दिलासा द्यावा. वळवाच्या अचानक झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत विधानसभेच्या येत्या अधिवेशनात आवाज उठवणार असून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com