घोड धरणातून उन्हाळी आवर्तन सुरू
मांडवगण फराटा, ता. १० : शिरूर व श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता.शिरूर) येथील घोड धरणातून उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले. धरणातून मंगळवारी (ता.१०) सकाळी १० वाजता पाच हजार क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. घोड धरणात सध्या सुमारे ५५ टक्के म्हणजेच २.०७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती उपअभियंता महेश शिंदे व कनिष्ठ अभियंता वैभव काळे यांनी दिली.
घोड धरणाच्या इतिहासात प्रथमच तब्बल पाच हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात टळणार असल्याचे सांगण्यात आले. पुढील दोन दिवस कमी-अधिक प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. ऐन उन्हाळ्यात व टंचाईच्या काळात पाणी सोडल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्या पत्नी मनीषा कटके तसेच माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा पाचपुते यांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यात आले.
घोड धरणाच्या खालील बाजूस शिरसगाव काटा, धनगरवाडी, नलगे मळा, गांधले मळा, खोरे वस्ती व तांदळी संगम असे सहा बंधारे असून नदीवरील सर्व बंधारे सुमारे ५० टक्के भरण्याचे घोड धरण प्रशासनाचे नियोजन आहे. अंदाजे २०० एम सेफ्टी पाणी नदीपात्रात सोडणार असून, हे आवर्तन दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे तीन हजार आठशे हेक्टर क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून घोड नदीचे पात्र कोरडे पडल्याने शिरसगाव काटा, पिंपळसूटी, इनामगाव, तांदळी तसेच श्रीगोंदा तालुक्यातील बोरी, वांगदरी, हंगेवाडी, काष्टी, सांगवी आदी गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली होती. याबाबत आमदार माऊली कटके यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.तसेच माजी आमदार अशोक पवार यांनीही कुकडी पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती.
यावेळी घोड धरणाचे उपअभियंता महेश शिंदे, कनिष्ठ अभियंता वैभव काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र गदादे, चिंचणीचे माजी उपसरपंच नामदेव पवार, इंद्रजित वाळुंज, सागर पवार, गौरव जांगडे, राहुल कांबळे, तुकाराम कानसकर, संभाजी पवार, रंगनाथ शिंदे, दादासाहेब पवार, रोहिदास पवार, संपत जगताप आदी उपस्थित होते.
पाणीपट्टी भरण्याचे आवाहन
घोड नदीवरील लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणीपट्टी पाटबंधारे उपविभागाच्या शिरूर येथील कार्यालयात जाऊन भरावी, असे आवाहन केले आहे. यासाठी सर्व शाखा कार्यालयांमध्ये तसेच ऑनलाइन यूपीआयद्वारे पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जलसंपदा विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन पाणीपट्टी वसुलीचे काम करीत आहे, असे घोडचे उपअभियंता महेश शिंदे यांनी केले.
02938
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

