
गांधीपूजकांनी जपली अभिवादनाची परंपरा
आळंदी, ता.१२: येथे (ता.खेड) राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची प्रार्थना गाऊन भक्तीमय वातावरणात आळंदीकरांनी रविवारी (ता.१२) त्यांना अभिवादन केले. गेली पंच्याहत्तर वर्षे येथील गांधी रक्षा विसर्जन स्तभांजवळ अभिवादनाची परंपरा गांधीपूजकांनी जपली आहे.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगर परिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने ''राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण'' हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावर्षी श्यामसुंदर सोन्नर यांचे कीर्तन आयोजित केले होते. गांधीपूजक कार्यकर्ते, वारकरी बांधव, ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक-युवती आणि राष्ट्रपित्याचा आदर करणारे नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते. खादीची शाल, विनोबा भावे लिखित ''ज्ञानेश्वरांची भजने'' आणि डॉ. कुमार सप्तर्षी लिखित ''राष्ट्रपिता महात्मा गांधी'' ही पुस्तके देवून सोन्नर यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन, माजी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, आदित्य घुंडरे, राजाभाऊ चोपदार, नंदकुमार वडगावकर, दत्तात्रेय बोरकर, डॉ. प्रवीण सप्तर्षी, संदीप बर्वे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, देवराम घुंडरे, गणपतराव कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर धुंडरे, भानुदास सात्रस, भारत दास, सुदर्शन चखाले, प्रा. नीलम पंडित, दीपक मोहिते, श्याम तोडकर, तसेच विविध वारकरी संस्थांचे विद्यार्थी महिला टाळकरी उपस्थित होत्या.
दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महात्माजींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांप्रमाणे इंद्रायणीमध्येही विसर्जन झाले. एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीमध्ये १२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले. त्यांची स्मृती म्हणून इंद्रायणी काठी रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला.
03130