
आळंदी उपोषणकर्त्यांची इंद्रायणी प्रदूषणाबाबत सोमवारी बैठक
आळंदी, ता. २: विरोधी पक्षनेते अजित पवार यांची शुक्रवारी (ता.२) जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांना मोबाईलवरून इंद्रायणी प्रदूषणाबाबत बैठक लावण्यास सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासंदर्भात निगडित असलेल्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्तपणे बैठक सोमवारी (ता. ५) पुण्यामधे ठेवल्याबाबतचे पत्र शुक्रवारी (ता.२) काढले.
पिंपरी महापालिका तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात इंद्रायणीत प्रदूषित सांडपाणी सोडले जाते. ते थांबण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात आळंदीत इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या पदाधिकारी विठ्ठल शिंदे, अरुण बडगुजर, शिरिष कारेकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, पुरुषोत्तम हिंगणकर, डाॅ सुनील वाघमारे यांनी १ मे ला उपोषण केले होते. यावेळी १० दिवसांत पुण्यात बैठक घेण्याबाबतचे लेखी आश्वासन आळंदीतील इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषण करणाऱ्यांना प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी पाच मे रोजी दिले होते. मात्र, त्यानंतर बैठकीबाबत काहीच निरोप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आला नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात स्मरणपत्रही उपोषणकर्त्यांनी दिले होते.
दरम्यान, शुक्रवारी वडमुखवाडीमधे एका हाॅटेलच्या उद्घाटनासाठी पवार आले होते. यावेळी ते माजी नगरसेवक विनया तापकीर यांच्या निवासस्थानी थांबले होते. यावेळी इंद्रायणी प्रदूषणाबाबत निवेदन इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या पदाधिकारी विठ्ठल शिंदे, शिरिष कारेकर, दिनेश कुऱ्हाडे, डाॅ सुनील वाघमारे, जनार्दन पितळे यांनी पवार यांना दिले. ते वाचले आणि पवार यांनी तत्काळ जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना बैठक घेण्याबाबत कळवले. आणि विठ्ठल शिंदे यांनाही बोलवा, असे आवर्जून सांगितले. यानंतर तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातून यंत्रणा हलली आणि इंद्रायणी प्रदूषणाबाबत तत्काळ सोमवारी (ता.५) बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लावली.