मांडे-आमरसाच्या मेजवानीने भाविक तृप्त

मांडे-आमरसाच्या मेजवानीने भाविक तृप्त

Published on

आळंदी, ता. १० ः गोपाळ काल्याचे कीर्तन....अन् आमरस मांडे भोजनाच्या महाप्रसादाने शनिवारी (ता. १०) गेली आठ दिवस सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोहळा मोठ्या भक्तिभावाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. मांडेभोजनाचा आस्वाद घेऊन आनंदसुख सोहळ्याच्या आणि संत विचारांच्या संस्काराची शिदोरी घेऊन राज्यभरातून आलेले भाविक परतू लागले.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० वा जन्मोत्सव सोहळा आळंदीत शनिवारी (ता. ३) ते शनिवार (ता. १०) दरम्यान हजारोंच्या संख्येने भाविक ज्ञानेश्वरी पारायण आणि विविध नामवंत कीर्तनकार-प्रवचनकार यांच्या कीर्तन सोहळ्यासाठी आळंदीत आले होते. दरम्यान शुक्रवारी (ता. ९) रात्री इंद्रायणी काठच्या दीपोत्सव झाला. आज सकाळी दहा वाजता आळंदीतील वारकरी संप्रदायातील उर्ध्वयू शांतीब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या कीर्तनासाठी मोठी गर्दी झाली होती. देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी कीर्तन मंडपात मोठी काला प्रसादाने भरलेली हंडी उभारली होती. हंडी फोडल्यानंतर कालाप्रसाद गोळा करीत उपस्थित भाविकांनी माउलीनामाचा गजर केला आणि आठ दिवसांच्या हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. त्यानंतर भाविकांची झुंबड उडाली ती आमरस आणि मांडे भोजनाच्या पंक्तीवर. जळगाव जिल्ह्यातून मांडे आणण्यात आले होते. आळंदीतील शेतकरी, व्यापारी, कामगार, राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी मिळून आमरस, भजी, आमटी, भाताचे जेवण केले होते. आळंदीकर तरुणाई भाविकांना जेवण, नाष्टा देण्यात मग्न होते. महाप्रसादाचे सेवन करून भाविक पुन्हा घरी परतू लागले. आठ दिवस कीर्तन-प्रवचनात मिळालेली संस्काराची शिदोरी घेऊन भाविक माघारी परतले.

आळंदी-पंढरीच्या दर्शनाने वैकुंठाचे दर्शन
शातिब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर म्हणाले, ‘‘भगवान परमात्मा भेटल्यानंतर जो आनंद भक्ताला मिळतो, तोच आनंद वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठल आणि आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाने मिळतो. तोच आनंद चंद्रभागेच्या वाळवंटात आणि आळंदीच्या इंद्रायणीकाठी मिळतो. खरे तर परमात्मा हा विठ्ठल आणि ज्ञानोबारायांच्या रूपात अवतीर्ण झालेला आहे. वैकुंठ आणि स्वर्गाचा आनंद हा आळंदी-पंढरीच्या दर्शनात असल्याने भक्तीचा समुदाय वारी करतो. आज जगाच्या पाठीवर कोणतेही तत्वज्ञान नाही जे ज्ञानेश्वरीत आहे. संतांचे अभंग तुमचे आमचे जीवन समृद्ध करतात. ज्ञानेश्वरी ग्रंथ चंदनाच्या वृक्षाप्रमाणे सुगंध देतो. ज्ञानेश्वरी पारायण करण्यात मोठा आनंद आहे. भक्तांना खरे ज्ञान देण्याचे काम ज्ञानेश्वरीत असल्याने दररोज त्याचे पारायण होणे आवश्यक आहे.’’
पारायण सोहळ्यासाठी पहिल्या दिवशीची आणि शेवटची अन्नप्रसादाची सोय आळंदीकरांकडे होती. सहा दिवस आमदार शंकर जगताप यांचे बंधू विजय जगताप यांच्याकडे होती. दोन्ही वेळचे अन्नप्रसादासाठीचे जेवण जगताप यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आळंदीकर ग्रामस्थ, जगताप कुटूंबीयांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com