आळंदी बाह्यवळण मार्गावरील पुलावरून जड वाहतूक बंद

आळंदी बाह्यवळण मार्गावरील पुलावरून जड वाहतूक बंद

Published on

आळंदी, ता. ११ : तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील चऱ्होली खुर्द ते चऱ्होली बुद्रूक या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावरील जड वाहतूक पुलाच्या दुरुस्तीसाठी बंद करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दिघी-आळंदी वाहतूक विभागाच्या पोलिसांना पत्र दिले आहे. दरम्यान, जेमतेम दहा वर्षांपूर्वीच बनवलेला पूल निकृष्ट झाल्याने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दहा वर्षांपूर्वी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आळंदीच्या बाह्यवळण मार्गासाठी इंद्रायणी नदीवर हा पूल बांधण्यात आला. या पुलामुळे मरकळ, चऱ्होली, धानोरे औद्योगिक भागातून येणारी अवजड वाहतूक परस्पर पिंपरी-चिंचवड भागात वळवली जात होती. मात्र, आधीच निकृष्ट दर्जाच्या आणि विलंबाने केलेल्या कामामुळे या रस्त्याची पुरती वाट लागली होती. हा संपूर्ण मार्गावरती सध्या खड्ड्यांची मालिका सुरू आहे. परिसरातील उद्योजक आणि कामगार वर्ग यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा उपद्रव जाणवत होता. दरम्यान, पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर पुलाच्या कामास तत्काळ सुरुवात केले जाणार आहे. दरम्यान, पुलावरील वाहतूक अन्यत्र वळवून दोन्ही बाजूस स्ट्रॉंग हाईट बॅरियर आणि सूचनाफलक तत्काळ बसवण्याचे सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिघी-आळंदी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच हा पूल वाहतुकीसाठी बंद होणार आहे.
इंद्रायणी नदीवरील बारा मीटर रुंदीच्या फुलाच्या सुधारणा कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून सात लाख ८१ हजार किमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सध्या याबाबत निविदा प्रक्रिया सुरू आहे.
कोंडीचा प्रश्न जटिल होणार
वाहतुकीसाठी पूल बंद केला तर मरकळ धानोरे औद्योगिक भागातून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना तसेच कर्मचाऱ्यांच्या वाहनांना पुन्हा आळंदीत शहरातूनच वर्दळ करावी लागणार आहे. आधीच आळंदीत वाहतुकीचे कोंडीचा प्रश्न आहे. उद्योजकांची वाहने आळंदीकडे आल्यास पुन्हा वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल होणार आहे.

तीन कोटी ८२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक
तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत आळंदीतील या बाह्यवळण मार्गासाठी १८ मीटर रुंद आणि दोन किलोमीटर लांबीचा रस्ता सुधारण्यासाठी तीन कोटी ८२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक ही किंमत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वी करण्यात आलेला रस्ता आता पुन्हा नव्याने केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com