यंदाच्या वर्षी वारकऱ्यांची संख्या घटली

यंदाच्या वर्षी वारकऱ्यांची संख्या घटली

Published on

आळंदी, ता. १४ : ओल्या दुष्काळामुळे मराठवाडा भागात झालेले शेतीचे नुकसान आणि आता वाफसा आल्यानंतर रब्बी पिकांच्या पेरणीची कामे उरकली नसल्याने मराठवाड्यातील शेतकरी वारकरी कार्तिक एकादशीला फिरकले नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या कार्तिक वारीत मराठवाड्यातील भाविकांची संख्या तुरळक आहे, तर कोकणातील वारकरी अधिक संख्येने सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झाल्याचे चित्र आहे.
सप्तमी, अष्टमी, दशमीपर्यंत आळंदीमध्ये कोकण, मराठवाडा, खानदेश, विदर्भ भागातील वारकरी मोठ्या प्रमाणात आळंदीमध्ये येतात. त्याबरोबरच पश्‍चिम महाराष्ट्रातील वारकरीही वारीसाठी आळंदीत अगोदरच येतात. दरवर्षी ही संख्या सुमारे सहा लाखांपर्यंत असते. त्यातील चार लाख भाविक चार ते पाच दिवस मुक्कामासाठी थांबतात. यंदा मात्र दशमीपर्यंत आळंदीतील रस्ते बऱ्यापैकी ओस आहेत. सायंकाळी पाच वाजले तरी रस्त्यांवर गर्दी कमी होती. मंदिर परिसरात दर्शन बारी आणि इंद्रायणी घाट वगळता अन्य ठिकाणी वारकऱ्यांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. एरवी दशमीपर्यंत आळंदीतील सर्व रस्ते पूर्ण भरून जातात. मात्र तुलनेत यंदा गर्दीचे प्रमाण कमी आहे. मराठवाड्यामध्ये नुकताच झालेला ओला दुष्काळ आणि त्यामुळे शेतीचे झालेले अतोनात नुकसान याचा परिणाम वारीवर दिसून आला. याचबरोबर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर शेतीमधील वाफसा सुरू झाला आणि पेरणीची कामे काही प्रमाणात सुरू आहेत. पेरणीची कामे रेंगाळल्याने मराठवाडा भागातील भाविक अद्याप कार्तिक वारीसाठी येऊ शकले नाहीत. दशमीला रात्री किंवा एकादशीला दिवसा वारकऱ्यांची गर्दी वाढू शकते असा अंदाज आहे.

मराठवाड्यातील दुष्काळ आणि नगरपरिषद जिल्हा परिषद निवडणुकीचा परिणामही कदाचित असू शकतो. दशमीपर्यंत गर्दी मोठ्या प्रमाणात असते ती यंदाच्या वर्षी कमी आहे. मात्र आज रात्रीपासून एकादशीला गर्दी अचानक वाढण्याची शक्यता आहे.
- योगी निरंजननाथ, प्रमुख विश्‍वस्त, आळंदी देवस्थान

वारकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मराठवाडा भागामध्ये ओला दुष्काळ झाल्याने आणि पेरणीची कामे रेंगाळल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. रब्बी हंगामातील पेरणी सुरू आहे. एक दिवसाची वारी मोठ्या प्रमाणात भरेल अशी आशा असल्याने एकादशीला गर्दी होईल.
- चैतन्य महाराज कबीर, विश्‍वस्त, आळंदी देवस्थान

यंदाच्या वर्षी पावसाने खूपच शेतीचे नुकसान केले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती खरडून गेली. नव्याने वावर करणे आणि शेतीला वाफसा मिळणे यावर रब्बी हंगाम पेरणी अवलंबून होती. आर्थिक नुकसान सामोरे जावे लागले. त्यामुळे मराठवाड्यातील वारकऱ्यांची संख्या कमी आहे.
- गंगाधर फड, मराठवाड्यातील वारकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com