

आळेफाटा, ता. २६ : बाजारभाव घसरल्याने जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी पारंपरिक कांदा साठवणुकीवर भर देत आहेत. वाढत्या महागाईमुळे उत्पादकांचा कुडाची कांदा चाळ उभारण्याकडे कल वाढला आहे.
लोखंड व स्टीलच्या भावात वाढ झाल्यामुळे शेतकरी लोखंडी चाळ उभारू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून आळे, राजुरी, कोळवाडी, बोरी बुद्रुक, जाधववाडी, आळे, संतवाडी, लवणवाडी परिसरात कांदा साठवणुकीसाठी कुडाच्या आरणी (चाळ) तयार करून त्यामध्ये कांदा साठवणूक केली जात आहे. यासाठी बाजरीचे सरमाड, पाचट, बांबू, प्लॅस्टिकची ताडपत्री यांचा वापर करण्यात आलेला आहे.
दरम्यान, गरजेनुसार लांबी व चार फूट रुंद याप्रमाणे एका आरणीत सुमारे ५०० ते ६०० पिशवी कांदा बसू शकतो. या आरणीत कांद्याचा कलर व पत्ती चांगली राहते. अलीकडे महाराष्ट्र शासन मार्फत राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाकडून सध्या कांदा चाळीसाठी शासनाकडून आर्थिक साहाय्य म्हणून ५, १०, १५, २० व २५ टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी कमी अनुदान दिले जाते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.