बोर्डाच्या प्रश्नपत्रिका देण्याबाबतच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा
पारगाव, ता. १४ : ‘‘दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी द्यायची नाही असा आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० फेब्रुवारी २०२३ रोजी काढल्याने विद्यार्थी तणावात येण्याची शक्यता अधिक वाटते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही होऊ शकतो व त्याचे गुणही घटू शकतात. त्यामुळे पुर्वीप्रमाणेच दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका द्यावी.’’ अशी मागणी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे राज्य सल्लागार प्राध्यापक राजेंद्र गवारी यांनी केली आहे.
प्रा. गवारी म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षापासून तणावमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे परीक्षा मंडळाचे धोरण स्वागतार्ह आहे. मात्र काही वर्षात पेपर फुटीचे प्रकार वाढल्याने बोर्डाने अचानक हा निर्णय घेतल्याचे समजते. पेपर फोडणारे दुसरेच असतात मात्र हे खापर विद्यार्थ्यांच्या माथी मारून बोर्ड मूळ प्रश्नापासून दूर जात आहे. प्रश्नपत्रिका फोडण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात मात्र या दहा मिनिटातच प्रश्नपत्रिका फुटते, हा बोर्डाचा जावई शोध वाटतो या निर्णयाने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. कारण दहावी आणि बारावीच्या सराव परीक्षा ही सर्व विद्यालयांनी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देऊनच घेतलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सरावही याच पद्धतीने झाला आहे.’’ त्यामुळे बोर्डाने विद्यार्थी हित ध्यानात घेऊन हा निर्णय मागे घेत फेब्रुवारी मार्च २०२४ पासून सुरू करावा अशी मागणी प्रा. राजेंद्र गवारी यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

