

आपटाळे, ता. १९ : ‘‘महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी स्फूर्ती व तेज शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरील मातीमधून मिळते. छत्रपती शिवरायांनी स्वतःकरिता काही केले नाही, त्यांनी संपूर्ण आयुष्य हे रयतेच्या कामी लावले. त्यांचे गड किल्ले हे मंदिरापेक्षा मोठे असून, या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी राज्यात टास्क फोर्स तयार करण्यात आला असून, महाराजांच्या गड किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेप्रसंगी शिवभक्तांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, बापू पठारे, माजी आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, आशा बुचके, सत्यशील शेरकर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, पुणे जिल्हा उत्तर अध्यक्ष बाळासाहेब मुळे, तालुकाध्यक्ष गणेश महाबरे, माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र बुट्टे पाटील, शहराध्यक्ष सिद्धेश ढोले, पूजा बुट्टे पाटील, प्रकाश ताजणे, राजेंद्र भगत यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘जागतिक वारसा स्थळांची ‘युनेस्को’च्या माध्यमातून निवड केली जाते. या स्पर्धेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले स्पर्धेत उतरवले आहेत. पुढील आठवड्यात पॅरिस येथे होणाऱ्या ‘युनेस्को’च्या महासभेत या गड किल्ल्यांचे सादरीकरण होणार आहे.’’
यावेळी अजित पवार म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा स्वराज्याच्या व जनतेच्या हितासाठी होता. महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे गड किल्ले हे खऱ्या अर्थाने राज्याची दौलत आहे. या गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन करण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही.’’
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘शिवजन्माचा मुहूर्त हा शिवभक्तांसाठी साडेतीन मुहूर्तापेक्षाही महत्त्वाचा आहे. मराठी अस्मिता व स्वाभिमानाची ठिणगी पेटविण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले. छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण व्हावे, यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही, ही शासनाची जबाबदारी आहे.’’
यावेळी शरद सोनवणे म्हणाले, ‘‘किल्ले शिवनेरी हे आदर्श मॉडेल म्हणून जगापुढे येईल. जुन्नर तालुक्यासाठी महत्त्वाचा असलेल्या दाऱ्या घाटाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.’’ ‘‘किल्ले शिवनेरीप्रमाणे राज्यातील प्रत्येक गड किल्ल्यांचा विकास व्हावा,’’ असे माजी आमदार अतुल बेनके म्हणाले.
आमदार शरद सोनवणे हे भाषण करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सन २०१४ ते सन २०१९ या काळात शिवजन्मभूमीच्या विकासाबाबत केलेल्या कामाची माहिती देत होते. त्यावेळी सोनवणे हे अजित पवार यांना उद्देशून म्हणाले, ‘‘आता तुम्ही तिघे एकत्र आहात.’’ त्याला अजित पवार यांनी तत्काळ उत्तर दिले व म्हणाले, ‘‘आम्ही तिघे नाही तर आपण चौघे आहोत.’’ त्यावर आमदार सोनवणे म्हणाले, ‘‘मी अपक्ष आहे, तुमच्यासोबत आहे. मानलं पाहिजे तुम्हाला दादा, सॅल्युट आहे तुम्हाला.’’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून सर्वात प्रथम भारताचा आत्माभिमान जागरूक करण्याचे काम केले. ते आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. ते केवळ योद्धे नव्हते, तर उत्तम प्रशासक, पर्यावरण, जलसंवर्धन, जंगल संवर्धन, तसेच विविध प्रकारच्या व्यवस्थापन शास्त्राचे गुरू होते. म्हणूनच आपण त्यांना आदर्श व जाणता राजा, असे म्हणतो.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.