भाषेच्या समृद्धी, संवर्धनासाठी सजग राहणे आवश्यक ः मोटे
भिगवण, ता. ३ ः ‘‘मराठी भाषा ही अभिजात भाषाच आहे. अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळणे ही बाब जरी अभिमानास्पद असली तरी मराठी भाषिकांनी भाषेच्या समृद्धी व संवर्धनासाठी सजग राहणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मोटे यांनी केले.
येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये मराठी भाषा पंधरवडा समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. तानाजी मगर होते. तर डॉ. प्रशांत चवरे, डॉ. बाळासाहेब खरात, प्रा. सारिका पाटील उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मोटे म्हणाले, ‘‘मराठी भाषेचा इतिहास अतिशय समृध्द आहे. परंतु, मराठी भाषिक हा समृध्द इतिहास विसरल्यामुळे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करावा लागतो ही खेदाची बाब आहे.’’
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, मेंहदी स्पर्धा, काव्यवाचन व मान्यवरांची व्याख्याने आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक डॉ. महादेव वाळुंज यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. सारिका पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. धनाजी मत्रे, प्रा. गोविंद आगरवाल, प्रा. आरती काळंगे, प्रा. वर्षा दराडे, प्रा. ऋतुजा हाके, प्रा. भाग्यश्री वाघमोडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

