भोरमधील कार्यकर्त्यांचे ‘वेट अॅड वॉच’

भोरमधील कार्यकर्त्यांचे ‘वेट अॅड वॉच’

Published on

विजय जाधव : सकाळ वृत्तसेवा
भोर, ता. ३ : अजित पवार याच्या निर्णयामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकायांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्यातरी ‘वेट अॅड वॉच’ असा सूर राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारे आहेत. त्यामुळे अजित पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांवर पक्षश्रेष्ठीकडून काय कारवाई होणार आणि पुढील कार्यपद्धती कशी राहील, याबाबात कार्यकर्ते वरिष्ठ पातळीवरील निर्णयाची प्रतिक्षा करीत आहेत.
तालुक्यातील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, युवा नेते विक्रम खुटवड, मानसिंग धुमाळ, गणेश खुटवड आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. परंतु, आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीतील या प्रकारामुळे भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भोर मतदारसंघातील राजकारण हे राज्याच्या घडामोडींवर अवलंबून राहणार आहे. राज्यातील राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि कॉंग्रेस या पक्षांनी आपले निर्णय जाहीर केल्यानंतरच तालुक्यातील राजकारणाचा खरा चेहरा लक्षात येणार आहे. तोपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती राहणार आहे. राजकीय पक्षांच्या निर्णयानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांवर बोलणे योग्य होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.

जगताप अजित पवार यांच्यासोबत
भोर तालुक्यातील जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांनी मात्र आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. धाडसी निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री राज्याला मिळाले असून, राज्याच्या विकासाची गती वाढणार आहे. ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाला योग्य असलेले नेते असल्यामुळे मी त्यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुळे-थोपटे काय भूमिका घेणार?
राष्ट्रवादीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भोर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे एकमेकांची मदत घेतील की नाही, हे राज्याच्या राजकारणावरच अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत सर्वजणच स्पष्टपणे बोलण्यास नकार देत आहेत. कारण, सर्वच राजकीय पक्षांचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील, हेच स्पष्ट होत नाही. त्यामुळे सध्यातरी सर्वांच्या मनात संभ्रमावस्थाच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.