बोपदेव घाटातील तीव्र वळणे काढण्याची मागणी
बारामती, ता. १९ : विविध कामानिमित्त बारामतीहून पुण्याला जाताना अनेक बारामतीकर बोपदेव घाटमार्गे पुण्याला जातात. बोपदेव घाटातील अवघड वळणे काढून रस्ता नीट केल्यास दिवे घाटावरील ताण कमी होऊन वाहतूक अधिक सुरळीत होईल. त्यामुळे या घाटातील तीव्र वळणे काढण्याची मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून होत आहे.
बारामतीहून विशेषतः मुंबईला जाताना अनेक जण सासवडवरून बोपदेव घाट उतरून कात्रजमार्गे पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरून पुण्याला जातात. मुंबईहून परत येतानाही हाच मार्ग वापरला जातो. या घाटात दोन ते तीन वळणे अत्यंत धोकादायक व तीव्र चढउतार असलेली आहेत. अनेक वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्याने ते या घाटाचा रस्ता टाळून ते दिवेघाट किंवा पुणे- सोलापूर महामार्गाने येणे पसंत करतात.
या घाटातील तीव्र वळणे कमी करून तेथे रस्ता सरळ केल्यास पुण्याला जाण्यासाठी तो अत्यंत जवळचा रस्ता होऊ शकतो, असे वाहनचालक आणि नागरिकांकडून सांगण्यात येते. पुण्याहून सासवडकडे घाट चढताना दोन वळणे अत्यंत नागमोडी व तीव्र चढ असलेली असल्याने येथे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.
घाट रस्ता किमान तीन पदरी केला तर वाहतुकीचा वेगही वाढू शकेल व वर्दळीच्या वेळेस वाहतूक वेगाने होऊ शकेल. या घाट परिसरात पथदिवे बसविल्यास किमान उजेड पडून वाहने दिसू शकतील. पावसाळ्यात पाऊस असला की समोरून येणारे वाहन दिसत नाही अशी स्थिती आहे.
बोपदेव घाटातील वळणे कमी करून घाट रस्ता तीन पदरी केल्यास मुंबईकडे जाणारी वाहतूक यामुळे वेगाने होईल. कोंडी कमी होऊन वाहनचालकांना दिलासा मिळेल.
- अविनाश जगताप, बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.