Onion
Onionesakal

Onion Subsidy : कांद्याला देण्यात येणारे अनुदान न मिळाल्याने शेतकरी चिंतेत

राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये कांद्याला प्रतिक्विंटलला साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
Published on

चाकण - राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये कांद्याला प्रतिक्विंटलला साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोनशे क्विंटलच्या मर्यादेत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार होते. तसेच फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार होते. ज्यांनी मुदतीत कांदा विक्री केली त्यांच्या अद्याप अनुदान मिळालेले नाही. यामुळे खेड तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहे.

चाकण येथील (ता. खेड) महात्मा फुले घाऊक बाजारात कांद्याच्या बावीसशे पिशव्यांची आवक झाली. कांद्याला घाऊक बाजारात प्रति किलोला किमान आठ ते अठरा रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, असे असले तरी अनुदान खात्यावर जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

शेतकऱ्यांनी कांदा अनुदान मागणी प्रस्ताव संबंधित बाजार समितीमध्ये सादर केले आहेत. मात्र, आता प्रस्ताव सादर होऊन चार महिने उलटले तरीही संबंधित शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, ३५० रुपये प्रति क्विंटल हे अनुदान शेतकऱ्यांसाठी खूपच कमी आहे. त्यामुळे अनुदान वाढवून देण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

दरम्यान, उन्हाळी हंगामातील कांदा पिकाची ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर नोंद आहे. त्या शेतकऱ्यांनाही अनुदान मिळाले पाहिजे, अशी मागणी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीने पणन संचालक व शासनाकडे केली आहे. याचा पाठपुरावा खेडचे आमदार दिलीप मोहिते, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे करत आहेत.

शासनाने आठवड्यात कांद्याच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने लवकर अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी हनुमंत गाडे, पोपट पवार, विक्रम शिंदे, गजानन गांडेकर यांनी व इतरांनी केली आहे.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कांदा अनुदान मिळवण्यासाठी सुमारे तीन हजार शेतकऱ्यांनी मागणी अर्ज केले. खरीप आणि रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले त्या शेतकऱ्यांचे अनुदान मागणीचे अर्ज मंजूर करण्यात आले व उन्हाळी कांद्याची नोंद असलेले अर्ज मंजूर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे तीन हजार मागणी अर्जापैकी फक्त पाचशे ते सहाशे शेतकऱ्यांनाच अनुदान मिळणार आहे.
- बाळासाहेब धंद्रे, सचिव, बाजार समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.