आचारसंहितेमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी

आचारसंहितेमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी

Published on

चाकण, ता. १८ : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेमुळे गावोगावी होणाऱ्या यात्रांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असल्याचे आदेश पोलिस प्रशासनाने दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वर्षातून एकदा येणाऱ्या गावोगावच्या यात्रा म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नाही. सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग मानला जातो. दरवर्षी ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्ताने तमाशा, भारुड, ऑर्केस्ट्रा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमधून लोककलावंतांना रोजगार मिळतो. तसेच, गावकऱ्यांना, यात्रेनिमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांना एक मनोरंजन म्हणून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा मात्र निवडणूक आचारसंहितेच्या कारणास्तव अशा कार्यक्रमांना पोलिस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात येत आहे, असे मेदनकरवाडीचे यात्रा कमिटीचे लक्ष्मण मेदनकर, रासेचे बाळासाहेब मुंगसे यांनी सांगितले. मेदनकरवाडी, रासे, कडाचीवाडी, वाकी खुर्द या गावांच्या यात्रा १ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान होत आहेत. त्यामुळे या गावातील सांस्कृतिक कार्यक्रम लोकनाट्य तमाशा, ऑर्केस्ट्रा यांना प्रशासन परवानगी नाकारत आहे. त्यामुळे नागरिक, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. कडाचीवाडी येथील यात्रा ५ फेब्रुवारीला मतदानाच्या दिवशी आहे. त्यामुळे यात्रेवर निवडणुकीचे पूर्णपणे सावट आहे.
पोलिस प्रशासनाच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. यात्रेचे कार्यक्रम अनेक महिन्यांपूर्वी ठरवलेले असतात. याचा राजकारणाशी तसेच निवडणूक प्रचाराशी काहीही संबंध नाही. केवळ आचारसंहितेच्या नावाखाली आमच्या परंपरा बंद पाडल्या जात आहेत अशी प्रतिक्रिया नागरिकांची आहे.

निवडणूक काळात कोणत्याही प्रकारे राजकीय प्रचार, अप्रत्यक्ष प्रभाव किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये राजकीय नेत्यांची, उमेदवारांची उपस्थिती, जाहिरातबाजी किंवा भाषणांचा धोका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली आहे. कार्यक्रमासाठी परवानगी निवडणूक आयोगाच्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घेणे गरजेचे आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.
- संजय सोळंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चाकण

गावातील यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमासंदर्भात यात्रा, उत्सव कमिटीने प्रथम पोलिस प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्यानंतर निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी. आचारसंहितेला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य करू नये.
- अनिल दौंडे, प्रांताधिकारी, खेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com