पाण्यासाठी पार करावी लागते चढण

पाण्यासाठी पार करावी लागते चढण

चास, ता. ७ : धामणगांव (ता. खेड) येथे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून विहिरीतील पाणीसाठा संपल्यात जमा आहे. शिल्लक असलेले पाणीही दूषित आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी अर्धा ते पाऊण किलोमीटरची चढण चढून आणावे लागत आहे. जनजीवन मिशनचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना आणि विशेषकरून महिलांना गेल्या महिन्यापासून त्रास सहन करावा लागत आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात डोंगरावर स्थित धामणगांव असून पक्क्या रस्त्याच्या माध्यमाने हे गाव मुख्य रस्त्याला जोडलेले आहे. या गावात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी विहीर असून या विहिरीवरून नागरिकांची तहान भागवली जाते. मात्र दरवर्षी मे महिन्यापासून या विहिरीतील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. मे महिन्याच्या सुरवातीपासूनच पाण्याची टंचाई सुरू होते. विहिरीतील पाण्याचा स्रोत आटल्यावर होणारी टंचाई महिलांसाठी डोकेदुखी होतेय. गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीयोजनेचे काम सुरू आहे, मात्र तेही पूर्ण न झाल्याने पाण्याची उपलब्धता नाही. सद्य:स्थितीत विहिरीतील पाणी डब्याने भरावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावाच्या खालच्या बाजूस पायथ्याशी असलेल्या हातपंपावरून पाणी आणावे लागते. त्यासाठी महिलांना पाऊण किलोमीटरची चढण चढावी लागतेय. येथील महिला गंगूबाई हांडे, भागूबाई हांडे, काळुबाई हांडे, सारा गवारी म्हणाल्या, वापरण्यासाठी हवे असलेले पाणी विहिरीच्या काठावर बसून डब्याने ओढावे लागते. तर पिण्यासाठी हातपंपावरून पाणी आणावे लागते. दरवर्षी हीच परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बाबत ग्रामसेवक एम. डी. सोनवणे म्हणाले, ‘‘टँकरचा प्रस्ताव पाठवला आहे. सद्य:स्थितीत आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने हातपंपावर मोटर बसवून पाइपच्या साह्याने पाणी गावात आणणार आहे. हे पाणी एका टाकीत सोडून वितरित करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com