कनेरसर येथे काव्यजागर संमेलन उत्साहात
दावडी, ता. १८ ः कनेरसर (ता. खेड) येथील जालिंदरनगर येथे शनिवारी (ता. १७) पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित काव्यजागर संमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पद्मश्री नारायण सुर्वे संस्कारक्षम शिक्षण संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले.
बालविद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षपूजन आणि कामगारभूषण राजेंद्र वाघ यांच्या ‘डोंगरी शेत माझं गं...’ या नारायण सुर्वे लिखित कवितेच्या सादरीकरणाने कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश गोरडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य संभाजी मलघे अध्यक्षस्थानी होते. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ, स्वागताध्यक्ष श्रमश्री बाजीराव सातपुते, पुरुषोत्तम सदाफुले उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षणतज्ज्ञ अश्विनी गोरे (पद्मश्री नारायण सुर्वे जीवनसाधना सन्मान), संस्कारक्षम गृहिणी संजीवनी डोंगरे (मास्तरांची सावली - कृष्णाबाई सुर्वे सन्मान), मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार), शिक्षिका रोहिणी दौंडकर (पद्मश्री नारायण सुर्वे शिक्षकप्रतिभा पुरस्कार), कवी संदीप वाघोले (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार) यांना प्रदान करून गौरविण्यात आले.
तसेच, संतोष गाढवे (मातीतून उगवलेल्या कविता) आणि आकाश भोरडे (झालं बाटुकाचं जिणं) यांच्या साहित्यकृतींना पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यापूर्वी, संगीता झिंजुरके, जयश्री श्रीखंडे, प्रतिमा काळे, प्रभाकर वाघाले, रजनी कानडे आणि सन्मानार्थी कवींनी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभिवाचन करीत काव्यजागर केला.
नारायण सुर्वे यांचे जीवन म्हणजे वेदनेचा प्रवास होय. जिल्हा परिषदेच्या शाळेला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून देणारे दत्तात्रेय वारे हे सर्वार्थाने आदर्श शिक्षक आहेत, परंतु सरकार संवेदनशीलता विसरली होती, अशी खंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी कार्यक्रमावेळी व्यक्त केली.
अरुण गराडे यांनी प्रास्ताविकातून पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रमांचे नियोजन असून, हे त्यातील चौथे पुष्प आहे, अशी माहिती दिली. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी नारायण सुर्वे यांचा जीवनपट कथन करीत, सुर्वे यांनी कामगार साहित्य चळवळीचा पाया घातला, असे मत व्यक्त केले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी सन्मानार्थींशी हितगूज करीत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. इंद्रजित पाटोळे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. राजू जाधव यांनी आभार मानले.
00041
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

