तंत्रज्ञानाबाबत शेतकरी साक्षर असावा

तंत्रज्ञानाबाबत शेतकरी साक्षर असावा

गुनाट, ता. २ : ‘‘भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत व पिकांच्या शास्त्रोक्त उत्पादन पद्धतीबाबत बहुतांशी शेतकऱ्यांमध्ये अज्ञान असणे, ही प्रचंड चिंतेची बाब आहे. शेती तंत्रज्ञान व पिकाबाबत शेतकरी साक्षर असणे, ही काळाची खरी गरज आहे. त्यासाठी जनचळवळ उभारणे गरजेचे आहे,’’ असे मत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शेतकरी व कांदा बीज संशोधक संदीप घोले यांनी व्यक्त केले.
करडे (ता. शिरूर) येथे सकाळ, ॲग्रोवन व भैरवनाथ कृषी एजन्सी यांच्यावतीने कांदा पिकाबाबत शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. डिजिटल शेती कंपनीचे व्यवस्थापक विजय सांगळे, ॲग्रोवन पुणे ग्रामीण प्रतिनिधी गोकूळ कदम, माजी सरपंच अतुल बेंद्रे, सोमनाथ बेंद्रे, उपसरपंच संतोष घायतडक, स्वप्नील घायतडक, भास्कर वाळके, आबासाहेब घुंबरे यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
घोले म्हणाले, ‘‘शास्रीय पद्धतीने शेती करताना माती परीक्षण, सेंद्रिय कर्ब, पाणी व खतांचे व्यवस्थापन, औषध फवारणीचे नियोजन अत्यावश्यक असते. मात्र, आपण आजही पारंपरिक शेती पद्धतीला प्राधान्य देत आहे. त्यामुळे उत्पादन व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळेच तोट्यात जाणारी शेती व्यवस्था आणि शेतकरी फायद्यात आणायची असेल; तर शेती व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांनी साक्षर झालेच पाहिजे.’’

परीक्षेत शेतकरी नापास
माती परीक्षण करता का? पाण्याचा पीएच चेक करता का? बीजप्रक्रिया करता का? बेसल डोस टाकता का? पीकपद्धतीबाबत सखोल अभ्यास करता का? पिकांना बुरशी का लागते? आदी शेतीसंबंधित महत्त्वाचे प्रश्न संदीप घोले यांनी शेतकऱ्यांची शाळा घेत शेतकऱ्यांना विचारले. मात्र, एखादं दुसरा शेतकरी वगळता बहुतांशी शेतकऱ्यांना या प्रश्नांची उत्तरे आलीच नाही. घोले यांच्या परीक्षेत शेतकरी अनुत्तीर्ण झाले. यावरूनच ग्रामीण भागातील शेतकरी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत किती अज्ञान आहे, हे स्पष्ट होते.

शेतकऱ्यांचे शेतीतील अज्ञान पाहता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी तज्ज्ञ व अभ्यासू व्यक्तींची चर्चासत्रे आयोजित केली पाहिजे. दुर्दैवाने अशी यंत्रणा आपल्याकडे योग्य पद्धतीने कार्यरत नाही. मार्गदर्शन करणारी सक्षम यंत्रणा उभी केल्यास खऱ्या अर्थाने शेतीपिकाबाबत साक्षर होईल.
- अतुल बेंद्रे, माजी सरपंच, आंबळे (ता. शिरूर)

आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना विनामूल्य मार्गदर्शन करतो. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याऐवजी आपल्याच ज्ञानाचा शेतकरी हितासाठी वापर केल्यास ती एक प्रकारे समाजसेवाच ठरेल.
- स्वप्नील घायतडक, भैरवनाथ कृषी एजन्सी, करडे (ता. शिरूर)
GUN24B00079

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com