वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

जुन्नर, ता.२३ : वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने तसेच त्यांच्या हलगर्जीपणामुळे निरपराध व निष्पाप नागरिकांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. या घटनांना त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे निवेदन गुरुवारी (ता.२३) पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जुन्नर तालुकाध्यक्ष रोहिदास कुटे, आंबेगाव तालुकाध्यक्ष तुकाराम गावडे, भूषण आवटी, मनाजी बांगर, प्रकाश कोळेकर तसेच संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

जुन्नर वनविभागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण देखील वाढले आहे. यात अनेक निरपराध शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना हल्ल्याला तोंड द्यावे लागले तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. बिबट हल्ल्यात झालेले नुकसान हे कधीही भरून येण्यासारखे नाही.
नागरिकांच्या जिवाचे रक्षण करण्यासाठी मानवी वस्तीत खुले आम फिरणाऱ्या बिबट्यांना पकडून वनक्षेत्रात सोडणे हे वनविभागाचे काम असताना याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने अनेक नागरिकांना गेल्या काही वर्षात जीव गमावण्याची पाळी आली.यात निष्पाप बालकांचा समावेश आहे. या सर्व दुर्दैवी घटनांना वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com