शेतकरी भरपाईच्या लाभापासून वंचित

शेतकरी भरपाईच्या लाभापासून वंचित

खळद, ता. १० : जिल्ह्यात गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासाठी ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे २१ कोटी २६ लाख ५७ हजार रुपये मिळाले होते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम गेले पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू आहे. मात्र, पुरंदर तालुक्यातील हजारो शेतकरी या लाभापासून वंचित आहेत.

पुरंदर तालुक्यातील २७,८४१ शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचा लाभ मंजूर झाला आहे. याबाबत शिवरी येथील शेतकरी नवनाथ गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आई-वडिलांच्या नावावर नुकसान भरपाईची रक्कम मंजूर आहे. मात्र, अद्यापपर्यंत ती मिळालेली नाही. शासनाच्या नियमानुसार त्यांचे आधार कार्डही लिंक केलेले आहे. मात्र पैसे खात्यात जमा झाले नाहीत. शासनाने विषय गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना सदर रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करावी अशी मागणी होत आहे.


कोणाकडे करावी चौकशी?
भरपाईची रक्कम ही शासनामार्फत ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होत असल्याने कृषी सहायक, गावकामगार तलाठी, संबंधित बँका अथवा तालुका प्रशासन यांच्याकडून याबाबत कोणतीही माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. यामुळे सदर अनुदानास विलंब होत असल्याने कोणाकडे चौकशी करावी हा फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.


मंत्रालयातून सदर रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत आहे. ही रक्कम वर्ग होत असताना आधार लिंक असलेले पी.एम.किसान लाभार्थी अथवा ज्यांचे केवायसी पूर्ण केले आहे अशा लोकांचे प्रथम पैसे पाठवले जात आहेत. ज्या ज्या सभासदांचे आधार लिंक अथवा केवायसी पूर्तता नाही यांच्याबाबत मात्र आम्ही काही सांगू शकत नाही. याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात समजेल. "
- दत्तात्रेय गवारी, निवासी नायब तहसीलदार.

कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांना मंजूर झाले आहेत. मात्र, ऑनलाइन पद्धतीतील किचकट बाबींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होताना विलंब होत आहे. ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी आता कोणाकडे दाद मागायची याबाबतही मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शासनाच्या नियमानुसार काही शेतकऱ्यांची केवायसी अथवा आधार लिंक नसेल व यामुळे पैसे प्रलंबित राहत असतील तर किमान अशा शेतकऱ्यांची यादी गाव कामगार तलाठी यांच्यामार्फत जाहीर करावी
- नवनाथ गायकवाड, शेतकरी शिवरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com