दळणवळण वाढीसाठी भीमा नदीवर पूल उभारा

दळणवळण वाढीसाठी भीमा नदीवर पूल उभारा

Published on

कडूस, ता. १० : पर्यटक, विद्यार्थी, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी व पश्चिम पट्ट्यातील दळणवळणाच्या वाढीसाठी भीमा नदीवर पूल उभारण्याची गरज आहे. यासाठी वेताळे ते कान्हेवाडी (ता.खेड) गावांच्या दरम्यान भीमा नदीवर पूल उभारावा, अशी मागणी वेताळे परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.

पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ व राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या वेताळे परिसरातील अथवा भीमा आणि भामा नदीच्या खोऱ्यातील ग्रामस्थ, नागरिकांना एकमेकांकडे ये-जा करण्यासाठी मोठा वळसा घालून राजगुरुनगर अथवा चासमार्गे प्रवास करावा लागतो. वेताळे येथे कान्हेवाडी दरम्यान, भीमा नदीवर पूल झाल्यास हा मोठा वळसा वाचणार आहे. हा रस्ता कान्हेवाडी खिंडीतून थेट आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी, कोटमदरामार्गे घोडेगावला जोडला आहे.

वेताळे येथे नुकतेच आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काम झाले आहे. रयत शिक्षण संस्थेचे श्रीसिध्देश्वर विद्यालय सुद्धा गावात आहे. कडधे, कान्हेवाडी, मोहकल परिसरातील रुग्ण उपचारासाठी तर विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. हा पूल झाल्यास या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. पश्चिम पट्ट्यातील अनेक गावे तालुक्याला जवळच्या मार्गाने जोडली जाणार आहे. या भागात एसटी बस सुरू होईल. दळणवळण वाढून पश्चिम डोंगराळ भागाला लाभ होईल.

चौदा किलोमीटरचा वळसा वाचणार
पश्चिम पट्ट्यातील चिखलगाव, एकलहरे, कळमोडी धरणाकडे जाण्यासाठी सुमारे १४ किलोमीटरचा वळसा वाचणार आहे. प्रवास खर्चात व इंधन खर्चात बचत होणार आहे. कुडा, वाजवणे, खरपूड, वांद्रे येथील पर्यटनाला चालना मिळेल. पश्चिम आदिवासी भागातील व्यवसायवृद्धी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.