वेताळे, साबुर्डी, सायगाव एकाच गणात समाविष्ट करा
कडूस, ता. ९ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०१७ च्या गट व गण रचनेनुसार करण्याचा शासनाचा मानस आहे, परंतु यामध्ये खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वेताळे, सायगाव व साबुर्डी या भौगोलिक दृष्ट्या एकाच भागातील गावांवर अन्याय होत असल्याची भावना या तीनही गावातील ग्रामस्थांची आहे. भौगोलिक, सामाजिक व राजकीय दृष्ट्या एकमेकांशी घट्ट नाळ जुळलेल्या तीनही गावांची वेगवेगळ्या तीन पंचायत समिती गणात विभागणी झाल्याने भागाला नेतृत्वाची संधी मिळत नाही, परिणामी या भागाच्या विकास कामांवर विपरीत परिणाम होत असल्याने तीनही गावे एकाच पंचायत समिती गणात व जिल्हा परिषद गटात सामील करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
वाडा-कडूस जिल्हा परिषद गटातील वाडा आणि कडूस गणाची जर भौगोलिक रचना पाहिली तर वेताळे, साबुर्डी व सायगाव ही तिन्ही गावे एकाच गणात हवी असताना तीनही गावे तीन वेगवेगळ्या गणात विभागली गेली आहेत. भीमा नदीच्या पात्राने या विभागाची दोन टप्प्यांत विभागणी केली आहे. वेताळे गावचा समावेश वाडा गणात आहे, तर सायगाव हे कडूस गणात असून साबुर्डी वाशेरे गणात ढकलले गेले आहे. प्रत्यक्षात वेताळे गाव भीमा नदीच्या दक्षिण बाजूला आहे, तर संपूर्ण वाडा गण भीमा नदीच्या उत्तर बाजूला आहे. नदीच्या पलीकडील एकमेव वेताळे हे गाव वाडा गणात जोडले आहे. वेताळे लगतचे सायगाव हे कडूस गणात जोडले आहे, तर साबुर्डी गावाचा वाशेरे गणात समावेश केला आहे. म्हणजेच तिन्ही गावे भौगोलिक दृष्टीने एकाच गणात हवी असताना तीन गावे तीन गणात विभागली गेली आहेत. भौगोलिक दृष्ट्या गणाची ही रचना चुकीची आहे. भीमा नदीच्या पात्राने वाडा आणि कडूस गणाची विभागणी झालेली आहे. त्यातच वेताळेवरून वाडा गावाला जाण्यासाठी नदी पार करावी लागते. थेट वाडा गावात किंवा वाडा गणातील गावांशी संपर्क साधण्यासाठी थेट शासकीय दळणवळण सेवेची सोय नाही. परिसराच्या विकास कामांवर सुद्धा परिणाम होत आहे. विकास कामांसाठी राजकीय दबाव हवा असतो, हा दबाव विभागला जातो. यामुळे अपेक्षित जनरेटा दिसत नाही. लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नाहीत. यामुळे तीनही गावे विकासात्मक दृष्ट्या मागे राहत आहेत. त्यामुळे सरळ वेताळे ते चांडोली अशी रचना होऊन ही तिन्ही गावे एकाच गणात समाविष्ट झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भौगोलिक रचनेनुसार वाडा कडूस जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची रचना करावी, अशी मागणी राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, माजी सरपंच विठ्ठल बोंबले तसेच वेताळे, सायगाव, साबुर्डी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.