साबुर्डी एसटी बंद केल्याने गैरसोय

साबुर्डी एसटी बंद केल्याने गैरसोय

Published on

कडूस, ता. ६ : राजगुरुनगर येथून सायंकाळी पाच वाजता सुटणारी साबुर्डी एसटी बस गेल्या पाच दिवसांपासून बंद झाल्याने तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवासी नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत आहेच, परंतु घरी पोहोचण्यास उशीर होत असल्याने पालकांच्या चिंतेतसुद्धा वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीची ही एसटी बस पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील कडूस, टोकेवाडी, सायगाव, वेताळे, साबुर्डी येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे.

राजगुरुनगरहून दोंदे, कडूस, सायगाव, वेताळे मार्गे सायंकाळी पाच वाजता सुटणारी साबुर्डी एसटी बस तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी सोयीची ठरत आहे. परंतु गेल्या आठवड्यापासून ही बस सेवा बंद असल्याने पश्‍चिम पट्ट्यातील विद्यार्थी, चाकरमानी, कृषी निविष्ठा खरेदीसाठी तालुक्याच्या गावी येत असलेले शेतकरी, दूध उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या मार्गावरील दोंदे, कडूस, सायगाव, वेताळे, साबुर्डी गावांच्या परिसरातील वाड्यावस्त्यांवरील सुमारे अडीचशे ते तीनशे विद्यार्थी महाविद्यालयीन व अन्य व्यावसायिक शिक्षणासाठी राजगुरुनगरला येत आहेत. यात विद्यार्थिनींचा पण मोठा सहभाग आहे. गावात पोहोचल्यानंतर अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी वाड्यावस्त्यांपर्यंत एक ते दोन किलोमीटर अंतर चालत जावे लागते. घरी पोचेपर्यंत काळोख पडतो. परिसरात बिबट्याची भीती आहे. एसटी बसची गैरसोय एखाद्या अप्रिय घटनेस जबाबदार ठरू शकते, अशी शंका पालकांना सतावत आहे. सायंकाळची ही एसटी बस सेवा बंद केल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांनी राजगुरुनगर आगार प्रशासनाकडे ही एसटी पूर्ववत सुरू राहावी, यासाठी प्रयत्न केले. परंतु उपयोग झाला नाही. विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी आगार प्रशासनाशी संपर्क साधून विनंती केली. विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे ही कैफियत मांडली. बससेवा पूर्ववत सुरू करण्याचे आश्‍वासन मिळाले, पण पूर्तता झाली नाही. विद्यार्थी, शेतकरी व चाकरमान्यांना सोयीची ठरणारी ही एसटी बस पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ, विद्यार्थी व शेतकऱ्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी सोयीची ठरणारी सायंकाळची एसटी बंद केल्याने विद्यार्थ्यांची मोठी परवड होत आहे. ही परवड गेली काही दिवस प्रत्यक्ष पाहत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी व शेतकऱ्यांची गैरसोय दूर व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी व मी स्वतः आगार प्रशासनाकडे विनंती केली. परंतु अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
- दिनेश ओसवाल, माजी अध्यक्ष, राजगुरुनगर सहकारी बँक आणि वेताळे गावचे ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com