धरणग्रस्तांचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याचा डाव
पळसदेव, ता. २१ : उजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रात सुमारे २५०० क्युसकने पाणी सोडण्यास शुक्रवारी (ता. २०) सुरुवात करण्यात आली. नदीलगतच्या पिण्याच्या पाणी योजनांसाठी हे पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आठवडाभरापूर्वीच सुमारे साडेतीन टीएमसी पाणी नदीत सोडले होते. यानंतर पुन्हा लगेच नदीत विसर्ग सोडणे बेकायदेशीर आहे. वारंवार नदीत पाणी सोडण्याचा घाट का घातला जात आहे? पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली वारंवार नदीत पाणी सोडण्याचा प्रकार म्हणजे धरणग्रस्तांचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याचा पाटबंधारे विभागाचा डाव असल्याचा आरोप संतप्त धरणग्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.
उजनी धरणात नऊ जानेवारीला १०० टक्के (११७ टीएमसी) पाणीसाठा होता. यानंतर १० जानेवारीपासून दहीगाव पाणी योजनेला ४० क्युसेकने तर बोगद्यातून १०० क्युसेकने पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली. धरणाच्या मुख्य कालव्यातून १७ जानेवारीला ५०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करून यात २१०० क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली. यादरम्यान बोगद्यातील पाण्याच्या विसर्गात ५०० क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली होती. सिना-माढा योजनेस २५ जानेवारीला पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली. तर पाच फेब्रुवारीला उजनी धरणामधून सहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. यामध्ये १६०० क्युसेकने वीज निर्मितीसाठी व ४४०० क्युसेकने थेट नदीपात्रात १२ फेब्रुवारीपर्यंत विसर्ग सुरू होता. या सात दिवसांच्या कालावधीमध्ये सुमारे ३.५ टीएमसी पाणी नदीद्वारे सोडून देण्यात आले होते. यानंतर लगेचच आठवडाभरातच आज पुन्हा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन पाणी सोडण्यात येत असल्याने, धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, उजनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सुचेता डुंबरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, वरिष्ठांकडून आलेल्या सूचनेनुसार उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. आता किती पाणी सोडले जाणार याबाबत माहिती नाही.
एकीकडे धरणग्रस्तांच्या गाळपेर जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव सरकारने आखला आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांचे हित साधण्यासाठी बेकायदेशीरपणे वारंवार नदीत पाणी सोडले जात आहे. हा प्रकार तातडीने थांबविण्याची गरज असून, धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून यावर लढा उभारला जाणार आहे, असे उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी सांगितले.
सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी समांतर जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जात असताना, वारंवार नदीत पाणी सोडण्याचा घाट का घातला जात आहे? पावसाळ्यानंतर धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना, पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली बेकायदेशीरपणे पाणी सोडले जात आहे.
- अरविंद जगताप, अध्यक्ष, उजनी धरणग्रस्त बचाव कृती समिती
शनिवार सकाळपर्यंत धरणात असलेला पाणीसाठा
* उजनी धरणातीला आजचा पाणीसाठा - ७४.८७ टक्के (१०३.७२ टीएमसी)
धरणातून सोडलेला विसर्ग (क्युसेकमध्ये)
* नदीपात्रात पाणी सोडण्याचा विसर्ग - २५००
* दहिगाव पाणी योजना - १००
* बोगद्यातून विसर्ग - ३००
* मुख्य कालव्याला विसर्ग - २५००

