

पळसदेव, ता. २५ : पळसदेव (ता. इंदापूर) परिसराला शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा फटका बसला. जोराच्या वाऱ्यामुळे शेतातील आंब्यांच्या कैऱ्या गळून पडल्या तर डाळींब, पेरू, केळी पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतातील कांदा, कडवळ, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी पत्र्याचे छत व सौर ऊर्जेचे पॅनेल वाऱ्याने उडून गेले. निसर्गाच्या या वक्रदृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करण्याची वेळ आली आहे.
सायंकाळी अचानक आलेल्या या वादळामुळे शेतकऱ्यांची नगदी पिके म्हणून ओळख असलेल्या कांदा, डाळींब, पेरू आणि आंबा यांसारख्या महत्त्वाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
फळबागांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला असून, कडवळ आणि मक्याची उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, काही घरांवरील पत्र्याची छते उडून गेली, तर काही ठिकाणी सौर पॅनेलही उखडून फेकले गेले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या होत्या. दरम्यान, शनिवारी (ता.२५) दिवसभर तारा ओढण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून सुरू होते.
निसर्गाच्या या फटक्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शासनाने भरीव नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
उसाच्या एका पाण्याची बचत
पळसदेव परिसरात झालेल्या पावसामुळे उसासारख्या पिकांची मात्र एका पाण्याची गरज भागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे उसाच्या पाण्याची गरज वाढलेली असताना, विजेच्या समस्येने पिकांचे भरणे निघत नसल्याची वस्तुस्थिती होती.
03556
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.