अन्यायकारक रेल्वे प्रकल्प होऊ देणार नाही

अन्यायकारक रेल्वे प्रकल्प होऊ देणार नाही

Published on

कुरुळी, ता. १० : तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन या प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या भागातील जनतेच्या मागण्या शासनाच्या समोर मांडण्याची आणि भांडण्याची जबाबदारी मी घेतली आहे. या प्रकल्पाच्या विरोधात आपण शेतकऱ्यांच्या सोबत राहणार असल्याची भूमिका शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतली.
कुरुळी (ता. खेड) येथे तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वेच्या विरोधात नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनात लोकप्रतिनिधी देखील सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (ता. १०) खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार बाबाजी काळे यांनी कुरुळीसह १२ गावांतील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या मार्गाच्या डीपीआर रद्द करण्याची मागणी स्थानिकांनी यावेळी लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली. हा मार्ग अनेक शेतकऱ्यांच्या शेत घरावरून जाणार असून स्थानिक रहिवासी आणि शेतकरी यांना मोठा आर्थिक आणि जमीन जाण्याचा धोका निर्माण झाल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी यावेळी सांगितले की, यापूर्वी सरकारने या भागातील अनेक शेतजमिनी एमआयडीसी, रिंगरोड, पुणे-नाशिक महामार्ग आदी अनेक प्रकल्पांसाठी आरक्षित केल्या आहेत आणि भू-संपादन केलेले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांकडे आता फक्त अल्प प्रमाणात जमिनी शिल्लक राहिलेल्या आहेत. ज्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
आमदार बाबाजी काळे यांनी देखील शेतकऱ्यांच्या सोबत या प्रकल्पाच्या विरोधातील लढ्यात आपण सहभागी असल्याचे आश्वासन दिले.


गरज पडल्यास मुठीही वळवता येते
या प्रकल्पाला थेट विरोध करीत नांदती घरे मोडून विकास होत नाही, विकास हवा असेल तर नांदती घरं मोडायची नसतात,’ अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे यांनी रेल्वे बायपास प्रकल्पावर थेट निशाणा साधला. हात जोडता येतात, पण गरज पडल्यास मुठीही वळवता येतात असा शब्दात इशारा देत खासदार डॉ. कोल्हेंनी नागरिकांच्या भावना स्पष्टपणे मेळाव्यातून व्यक्त केल्या.

जनतेने आंदोलनाची रणनीती आखली
तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वे बायपास प्रकल्पाच्या आराखड्याला आता स्थानिक ग्रामस्थांनी ठाम विरोध सुरू केला आहे. उद्योगांच्या वाहतुकीसाठी हा बायपास आवश्यक असल्याचे रेल्वे विभागाचे म्हणणे असले तरी या प्रकल्पाचा थेट परिणाम चाकणमधील १२ गावांसह मावळ, हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांवर होणार आहे. आधीच एमआयडीसी, रिंगरोड आणि महामार्गासाठी जमीन गेलेली असताना आता रेल्वेसाठीही जमीन घ्यायची, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. सध्या या प्रकल्पाचा डीपीआर आणि नकाशा आखणीचे काम सुरू असून, त्याआधीच स्थानिकांनी मोठ्या आंदोलनाची रणनीती आखल्याचे समजते, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com