जिल्ह्यातील २१० गावांत नैसर्गिक शेती अभियान

जिल्ह्यातील २१० गावांत नैसर्गिक शेती अभियान

काटेवाडी, ता. ६ : विषमुक्त अन्न, प्रदूषण विरहित जमीन व पाणी आणि एकूणच शाश्वत कृषी उत्पादनासाठी नैसर्गिक, सेंद्रिय शेतीला कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान २१० गावांमध्ये सुरू असून आत्तापर्यंत ६ हजार ७५६ शेतकरी या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत. तर ६ हजार ८०० हेक्टर क्षेत्राची नोंदणी कृषी विभागाकडून पूर्ण करण्यात आली आहे.

रासायनिक खतांचा अति वापर, पिकांचे अवशेष जाळणे, पिकांची योग्य फेरपालट न करणे, मशागतीच्या अयोग्य पद्धती, गाई-म्हशींचे घटते प्रमाण आणि त्यामुळे शेणखताचा कमी वापर इत्यादी कारणांमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाणात लक्षणीय घट होत असल्याचे कृषी तज्ञांच्या निदर्शनास आले आहे. तसेच शेत जमिनीमध्ये सद्यःस्थितीत सर्वसाधारणपणे ०.४० टक्के पेक्षा कमी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रसायनांचा अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा पोत खालावलेला आहे. जमिनीतील जीवसृष्टीच्या वाढीसाठी पोषक वातावरण ठेवल्यास जमिनीचे आरोग्य चांगले राहते. तसेच सेंद्रिय कर्बामध्ये देखील वाढ होते. साधी बाबींचा विचार करूनच या नैसर्गिक शेती अभियानाची घोषणा राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून करण्यात आली. या अभियानाअंतर्गत पुणे जिल्ह्याला १६० शेतकरी गट व ८ हजार हेक्टर क्षेत्राचे यंदाच्या वर्षी उद्दिष्ट देण्यात आले आहे.


अभियानाची उदिष्टे :
१) नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर थांबवून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारणे.
२) रसायनमुक्त सुरक्षित, सकस व पोषणयुक्त नैसर्गिक व सेंद्रिय शेतमाल उत्पादित करणे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतमालाची मुल्यसाखळी विकसित करणे.
३) नैसर्गिक व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे आणि कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र यांच्या समन्वयाने नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखालील क्षेत्रात वाढ करणे.
४) समूह संकल्पनेव्दारे उत्पादक गटांची स्थापना करणे आणि गटांचे समूह तयार करून शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करणे.
५) शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावर शेतावरील जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करून स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे.


महिला शेतकऱ्यांचा देखील वाढतोय सहभाग
नैसर्गिक शेती अभियानामध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. किमान ३० टक्के पर्यंत महिलांचा योजनेत सहभागी करण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून होत आहे. कुटुंबात महिलांच्या नावे शेती नसेल आणि कुटुंबातील अन्य व्यक्तीच्या नावे शेती असल्यास अशा कुटुंबातील महिलांचा गटात सदस्य म्हणून सहभाग करण्यात येत आहे. एका गटामध्ये एकूण नोंदणी क्षेत्र ५० हेक्टरच्या कमाल मर्यादेत राहील असे गृहीत धरून गटांचे लक्षांक देण्यात आले आहे. तथापि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता
२५ हेक्टरचा एक शेतकरी गट याप्रमाणे गटांची स्थापना करण्यात येत आहे. अशा रीतीने नव्याने स्थापन केलेल्या गटांची नोंदणी आत्मा अंतर्गत करण्यात येत आहे.
-------------------------------
अभियानाची पुणे जिल्ह्यातील सद्यःस्थिती
तालुका.... शेतकरी गटसंख्या ...... नोंदवलेले क्षेत्र (हेक्टर)
भोर ---------९------------------------४५०
वेल्हा --------७------------------------३५०
मुळशी ------१०---------------------५००
मावळ --------१२--------------------५००
हवेली --------२०----------------------५००
खेड -----------१८---------------------५००


आंबेगाव ------१०---------------------५००
जुन्नर ----------- १४-------------------६५०
शिरूर ---------१५---------------------५००
बारामती -------१३---------------------६५०
इंदापूर ----------२३---------------------१,०००
दौंड --------------५-----------------------२५०
पुरंदर ---------------९--------------------४५०
-------------------------------------

सध्या सेंद्रिय शेतमालाला शहरी बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळत आहे. हे अभियान सेंद्रिय शेतमालाचे जास्तीत जास्त उत्पादन व्हावे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. बाजारात असणारी सेंद्रिय शेतमालाची मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी हे अभियान आर्थिक उत्पादन वाढवणारे ठरेल.
- सुप्रिया बांदल, तालुका कृषी अधिकारी बारामती


डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानच्या माध्यमातून सातबारा धारक महिला शेतकऱ्यांना कृषी विभाग व आत्मा कडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांनी या अभियानामध्ये सहभागी व्हावे.
- गणेश जाधव, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा बारामती

94323

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com