

कुरकुंभ, ता. ४ : जिरेगाव (ता. दौंड) येथे ‘महावितरण’तर्फे सायंकाळी ६ ते १० या वेळेत केल्या जाणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे ही वेळ गैरसोयीची ठरत असून, भारनियमन पहाटेच्या सत्रात करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण आहेत. सायंकाळच्या वेळीच वीजपुरवठा खंडित होत असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. घरात बसणे असह्य होत असून अंधारामुळे दैनंदिन कामांत अडथळे येत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
याबाबत ज्येष्ठ नागरिक अरविंद भापकर म्हणाले, ‘‘सायंकाळची वेळ नागरिकांसाठी त्रासदायक आहे. ‘महावितरण’ने वेळापत्रकात बदल करून भारनियमन पहाटे ६ ते १० या वेळेत ठेवावे, जेणेकरून रात्री नागरिकांना दिलासा मिळेल.’’ प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.